औरंगाबाद : शहरात धावणारी सिटी बस ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत . राज्यात ३१ मार्चपर्यंत १४ जिल्ह्यात लॉक डाऊन करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. राज्य सरकारने लॉक डाऊन जाहीर केल्यावर सिटी बस बाबतचा हा निर्णय घेतला.
करोना पसरू नये म्हणून महापालिकेने सिटी बस शनिवारी बंद ठेवली होती, तर रविवारी जनता कर्फ्यू मुळे बंदची चाके थांबली होती. शहरातील २७ मार्गांवर धावणाऱ्या सिटी बसमधून दररोज जवळपास २५ हजार नागरिक प्रवास करतात. करोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रवाशांची संख्या घटली होती.
सोमवारपासून २० टक्के फेऱ्या कमी करून सिटी बसचे नियोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ३१ मार्चपर्यंतच्या लॉक डाऊनचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या सुचनेनुसार सिटी बस ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती चिफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रशांत भुसारी यांनी दिली.