भाजपचा जोर अन् शिवसेनेला लागला घोर

Foto
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकी नंतर बदललेल्या राजकीय गणितामध्ये भाजपने जिल्ह्यात जोमाने काम सुरू केले आहे. पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या असो की आता डॉ.भागवत कराड यांना राज्यसभेची दिलेली उमेदवारी. या सर्व घडामोडी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बळकटी देणार्‍याच आहेत. दुसरीकडे शिवसेनेत मात्र अस्वस्थता दिसून येते. खासदार खैरे नाराज आहेत तर जुने निष्ठावंत न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
 विधानसभा निवडणुकीत आयारामांनी घात केल्याचे शल्य भाजपला अजूनही बोचते आहे. जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याचा फटका विधानसभा निवडणुकीत असल्याची कबुली भाजपचे वरिष्ठ नेते खासगीत बोलताना देतात. त्यानंतर पक्षाने आपले धोरण बदलले. जुन्या निष्ठावंतांना न्याय देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजप शहराध्यक्ष पदाच्या निवडीत ही पक्षाने जुन्या नेत्यांचा प्राधान्याने विचार केला. त्यामुळेच संजय केणेकर यांच्यासारख्या लढवय्या कार्यकर्त्याला शहराध्यक्ष पदाचा सन्मान मिळाला. जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या पदावर जुन्या निष्ठावंतांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पक्षांतर्गत सुरू असलेल्याबैठकांच्या सत्रातही जुन्या निष्ठावंतांना सन्मान दिल्याचे दिसून आले. महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने वार्ड निहाय जुन्या कार्यकर्त्यांची यादी तयार केली आहे. या कार्यकर्त्यांना पुन्हा सन्मानाने कामाला लावल्याचे दिसून येते.
 कराड यांना लॉटरी
भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भागवत कराड यांना अचानक राज्यसभेची लॉटरी लागली आहे. राज्यातून बलाढ्य नेत्यांना बाजूला सारत पक्षाने थेट डॉ.कराड यांना संधी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र या पाठीमागे निष्ठावंतांना न्याय देण्याची पक्षाची भूमिका असल्याचा संदेश कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. विशेषतः मराठवाड्यात पक्ष बळकटीकरणासाठी याचा मोठा वापर होईल, असा दावा भाजप नेते करीत आहेत. जुन्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा पक्षाबद्दल विश्वास निर्माण व्हावा असा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर नाराज वंजारी समाजालाही चुचकारण्याचा करण्याचा प्रयत्न डॉक्टर कराड यांच्या उमेदवारीतुन झाल्याचे दिसते. खैरे यांचा त्रागा
 लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे पक्षात एकाकी पडल्याचे चित्र आहे. गेल्या 40 वर्षांपासून पक्षाचे निष्ठेने काम करणार्‍या खैरे यांच्या एका पराभवानंतर बदललेली परिस्थिती शिवसेनेसाठी चिंताजनक बनली. राज्यसभेसाठी खैरे गुडघ्याला बाशिंग बांधून होते. मात्र ऐनवेळी काँग्रेसमधून पक्षात आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना पक्षाने राज्यसभेचे उमेदवारी दिली. त्यामुळे निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना पक्षात पसरली आहे. खैरे यांनी त्रागा व्यक्त करीत पक्षाच्या भूमिकेवर  प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पक्षाने आपली कदर केली नाही, अशी भावना त्यांनी बोलून दाखविली. खैरेंना डावलल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांतही नाराजीचा सूर उमटत आहे. एकीकडे भाजप निष्ठावंतांना संधी देत असताना शिवसेनेत मात्र आरामाची चलती कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker