एपीआय कॉर्नर, महालक्ष्मी चौक ठाकरे नगर अंतर्गत असलेला रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे. ठिकठिकाणी झालेल्या खड्डयांमुळे पावसाळयात या रस्त्यांवरुन चालणे सुद्धा अवघड झाले आहे.सध्या तर याठिकाणी पाण्याचे मोठमोठे तळे साचले आहे. अर्धवट केलेला रस्ता व खड्डे यांमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू असून नागरिकांनी या रस्त्याच्या कामाबाबत संताप व्यक्त केला.
गेल्या 8-10 वर्षांपासून या रस्त्याचे काम झालेलेच नाही असे इथल्या दुकानदार व्यावसायिकांचे व रहिवाशांचे म्हणणे आहे. या रस्त्यावर दवाखाने, किराणा, जनरल दुकाने आहेत. काहींनी स्वखर्चाने भरती टाकून खड्डे बुजवले होते. पण त्याचा काहीहि फायदा झाला नाही. महालक्ष्मी चौक ठाकरे नगर रस्त्यासाठी 80 लाखांचा निधी मंजुर झालेला आहे. महानगरपालिकेच्या हलाखीच्या स्थितीमुळे सुरुवातीला कोणीही यासाठी टेंडर भरलेले नाही. एपीआय कॉर्नर मार्गावरिल रस्त्यासाठी देखील 1 कोटींचा निधी मंजुर झालेला होता. मात्र अजूनही येथील रहिवाशांच्या नरकयातना संपलेल्या नाही. मागच्या वर्षी झालेल्या पावसाळ्यात या रस्त्याच्या पॅचवर्कचे काम हाती घेण्यात आले होते. स्वतः माजी नगरसेविकांच्या देखरेखीखाली हे काम झाले परंतु या गोष्टीला महिना होण्याआधीच बुजवलेले खड्डे पुन्हा पूर्व परिस्थितीत आले. या पॅचवर्कमुळे पसरलेल्या खडीमुळे अपघातांचे प्रमाण मात्र वाढले आहे. केलेले थोडेथोडके काम पावसामुळे मात्र पाण्यात गेले. शाळेत जाणारे विद्यार्थी, परिसरातील वसाहतींमध्ये राहणारे नागरिक यांना या रस्त्याचा वापर करावा लागतो. रस्ता कमी आणि खड्डेच जास्त यामुळे नागरीकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.