अजय देवगण करणार या चित्रपटाची निर्मिती
काही दिवसांपूर्वी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय जवानांनी चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. तसंच यादरम्यान २० भारतीय जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर काही जवान जखमीही झाले होते. आता गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. फिल्म क्रिटीक आणि ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
अजय देवगण गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीवर चित्रपट तयार करणार आहे. सध्या या चित्रपटाचं नाव ठरवण्यात आलं नाही. या चित्रपटात चीनच्या लष्कराच्या सामना केलेल्या त्या २० जवानांची शौर्यगाथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही अजून अंतिम करण्यात आलेली नाही,” असं ट्विट तरण आदर्श यांनी केलं आहे.अजय देवगण एएफ फिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्स एलएलपी हे या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत. १५ जून रोजी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक चकमक झाली होती. यामध्ये २० भारतीय जवानांना हौतात्म्य आलं होतं. १९७५ नंतर पहिल्यांदा या ठिकाणी अशी चकमक पाहायला मिळाली होती. १९७५ मध्ये चीनच्या लष्करानं अरूणाचल प्रदेशमधील भारतातील लष्कराच्या गस्त घालणाऱ्या पथकावर हल्ला केला होता.