मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील वादग्रस्त स्टिंग ऑपरेशननंतर महत्त्वाची प्रशासकीय हालचाल करण्यात आली आहे. झिरवाळ यांचे खाजगी सचिव म्हणून प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले डॉ. रामदास गाडे यांना तत्काळ पदावरून कार्यमुक्त करण्यात आले असून, त्यांची सेवा मूळ विभागात प्रत्यावर्तित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डॉ. गाडे हे सहायक आयुक्त (पशुसंवर्धन), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत होते. ते प्रतिनियुक्तीवर खाजगी सचिव म्हणून काम पाहत होते. १६ फेब्रुवारी २०२६ (म.पु.) पासून त्यांची बदली करून त्यांना पुन्हा कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई येथे रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भातील आवश्यक आदेश तातडीने निर्गमित करावेत, असे पत्र सामान्य प्रशासन विभागाला पाठवण्यात आले आहे.
स्टिंग ऑपरेशनमुळे खळबळ
झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच घेण्यासाठी कथित ङ्गसिक्रेट कोडवर्डफ वापरला जात असल्याचा आरोप समोर आला आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये फाईलवर पेनाने एक लाईन मारणे म्हणजे ५० हजार रुपये, तर दोन लाईन म्हणजे १ लाख रुपये अशी खूण वापरली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात डॉ. गाडे यांचे नाव समोर आले आहे. मेडिकल दुकानदार निर्मल शर्मा यांनी केलेल्या स्टिंगनुसार, औषधांच्या फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या व ओआरएस ठेवल्यामुळे त्यांचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला होता. त्याविरोधात त्यांनी ७ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात अपील दाखल केले. १३ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली.
सुनावणीसाठी मंत्रालयात गेलेल्या शर्मा यांना डॉ. गाडे यांच्या केबिनमध्ये बसवण्यात आले. त्यावेळी लिपिक राजेंद्र ढेरंगे यांनी कथितरित्या १ लाख १० हजार रुपयांची मागणी केली. त्यातील १ लाख ङ्गवरच्या अधिकार्यांसाठीफ आणि १० हजार स्वतःसाठी असल्याचा उल्लेख व्हिडिओमध्ये ऐकू येत असल्याचा दावा आहे. शर्मा यांनी रक्कम जास्त असल्याचे सांगितल्यानंतर ५० टक्के सवलत देण्याची ऑफर देण्यात आली. त्यांनी २ हजार रुपये ऑनलाईन व ५३ हजार रुपये रोख दिल्याचे सांगितले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार
२१ फेब्रुवारी रोजी शर्मा पुन्हा मंत्रालयात गेले असता मंत्री झिरवाळ कार्यालयात उपस्थित होते, मात्र त्यांना मंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले गेले नसल्याचा आरोप आहे. त्याऐवजी पुन्हा डॉ. गाडे यांच्याकडेच पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात कार्यालयातील इतर कर्मचार्यांचाही सहभाग असल्याची शंका व्यक्त होत आहे. दरम्यान, शर्मा यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.