मुंबई : मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसेनं बोगस मतदानाविरोधात सत्याचा मोर्चा काढला आहे. मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतलाय. मोर्चेकरांनी हातात विविध फलक घेत सहभाग नोंदवलाय.या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. एवढंच नाही तर दुबार आणि तिबार मतदार मतदान केंद्रावर आढळल्यास त्यांना फोडून काढा, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
विरोधकांच्या सत्याच्या मोर्चात हजारो लोकांनी गर्दी केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार यांनी फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत पायी चालत सत्याच्या मोर्चात सहभाग नोंदवला. यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयासमोर सभा झाली. यासभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाषण करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
राज ठाकरे म्हणाले, जो मतदार उन्हात उभा राहतो, आणि मतदान करतो त्याच्या मतदानाचा हा अपमान आहे. जेव्हा निवडणुका होतील तेव्हा हे दुबार, तिबार मतदार मतदान केंद्रावर दितले तर त्यांना तिथेच फोडायचे... मतदार केंद्रावर बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हाती द्यायचे त्याशिवाय हे वठणीवर येणार नाही. मी तुमच्यासाठी पुरावा आणलाय.
फक्त विरोधी पक्ष नाही तर भाजपसह सगळेच सत्तेतील पक्ष म्हणत आहे की दुबार मतदार आहेत. मग माहीत असून देखील म्हणतात की निवडणुका घ्या.. का घ्या कुणाला काय घाई आहे. आणखी एकवर्ष नका करू निवडणूक घेऊ नका असा काय फरक पडणार आहे, असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
एका आमदाराचा मुलगा सांगतो की मी २० हजार मतदार आणले. नवी मुंबईच्या आयुक्ताच्या घरावर १३० लोक नोंदवले. परवा मी मशिनबद्दल बोललो. २३२ आमदार निवडून आल्यानंतर मात्र असेल तर सगळे मतदार गोंधळले असतील तर निवडणुका कशाला? आजचा मोर्चा हा राग आणि ताकद व्यक्त करण्याचा आहे. मतदान याद्या साफ करा आणि निवडणूक घ्या, असे राज ठाकरे म्हणाले.