फळे, भाजीपाला विकण्याची आली पाळी
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मार्च महिन्यापासून राज्यात सर्वत्र लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. एस.टी. ची वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून एस.टी. महामंडळातीूल कर्मचार्यांना नियमित व पूर्ण वेतन दिले जात नाही. वेतन मिळत नसल्याने या कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर काही कर्मचार्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवता यावा यासाठी फळे आणि भाजीपाला विक्रीला सुरुवात केली आहे. राज्य शासनाने कर्मचार्यांना नियमित व पूर्ण वेतन द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने राज्य शासनाकडे केली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला. शासनाने एस.टी. बसमधील प्रवाशांमधून संसर्ग वाढेल यासाठी एसटीची बस सेवा मार्च महिन्यांपासून बंद केली. गेल्या काही दिवसांपासून जिल्हांतर्गत काही बसेस सुरू केल्या पण त्यास पाहिजे तसा प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने काही बसेस बंद करण्यात आल्या आहेत. महामंडळातील हजारो कामगारांना मार्च महिन्यात 75 टक्के, एप्रिल महिन्यात पूर्ण वेतन व मे महिन्यात आणि जून महिन्यात 50 टक्के वेतन देण्यात आले. महामंडळाकडे मार्च महिन्याचे 25 टक्के आणि मे महिन्यासचे 50 टक्के थकबाकी आहे. ती त्वरित देण्यावी यावी, तसेच कोव्हीड-19 अंतर्गत सेवा देणार्या कर्मचार्यांना जिविताचे रक्षण करण्यासाठी आरोग्य साहित्य देण्यात यावे, या मागणीसाठी मनसे कामगार सेनेच्या वतीने मंगळवारी राज्यभर आंदोलन करून जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले आहे. कामगारांची देयके न दिल्याने त्यांच्यावर मोलमजुरी, फळे, भाजी विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे थकीत वेतन त्वरित द्यावे, अशी मागणी कामगार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोक पवार पाटील, अध्यक्ष हरी माळी, प्रदेश उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, संदीप जाधव, उमेश दीक्षित, एन.डी. दिनोरिया यांनी केली आहे.