काल एकनाथ शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, राज ठाकरेंनी भेटींचं कारण सांगितले....

Foto
 मुंबई  : राज्यात नुकत्याच महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची आज (१८ फेब्रुवारी) भेट झाली. दोघांच्या या भेटीनंतर राज्यात विविध चर्चांना उधाण आले होते. परंतु मुंबई शहराच्या अनधिकृत पार्किंगच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. फक्त मुंबईचाच विषय नव्हे तर पुणे नाशिक आणि इतर नव्याने वाढत असलेल्या शहरात वाढलेली वाहतूक कोंडी आणि विकासकामे यात पार्किंगमुळे अडथळे निर्माण केले जातात. त्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. याबाबत राज ठाकरे यांनी माहिती दिली. 

एकनाथ शिंदेंच्या भेटीवर राज ठाकरे काय म्हणाले? 

आपल्याकडे आता पूर्वीसारखं राजकारण राहिलेलं नाहीय. आता काही नाहीय. निवडणुका संपल्या आहेत. आम्हाला जर काही सांगायचे असेल, काही चांगल्या गोष्टी करुन घ्यायच्या असतील, तर भेट  घेतलीच पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायची गरज नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले. मी त्याचदिवशी बोलणार होतो. आपल्याकडे चांगले रस्ते, फ्लायओव्हर्स व्हावेत चांगली गोष्ट आहे. मात्र आपण मूळ गोष्टाली हात घालत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होते आहे त्याचा लोकांना किती त्रास होतोय, मलाही होतोय. लोकांकडे एकापेक्षा जास्त कार असतात. अनेक इमारतींमध्ये पार्किंगचा मोठा मुद्दा आहे. मागे हीच गोष्ट मी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितली होती. त्यांनी लगेच भूषण गगराणींना फोनकरून सांगितले होते, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. तसेच काल एकनाथ शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही भेटेन, असंही राज ठाकरे म्हणाले.