महाराष्ट्रासह १७ राज्यांना वादळी पावसाचा महाअलर्ट

Foto
मुंबई : सप्टेंबर महिना येताच अनेक राज्यात पावसाने दस्तक दिली आहे. कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने वातावरण थंडगार झालं आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा अलर्ट जारी केला आहे. आज ५ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारसहीत १७ राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. ताशी ५०-६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. वातावरणच इतकं थंड होणार असल्याने नागरिकांना आता कूलर, पंखे लावण्याची गरज भासणार नाहीये. मात्र, पावसामुळे अलर्ट राहावं लागणार आहे.

पूर्व भारतात विजा कोसळण्याची आणि वज्रपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासकरून शेतकर्‍यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच डोंगराळ भागात फिरायला जाण्याचा इरादा असेल तर आताच सावधान व्हा. डोंगराळ भागात फिरायला जाऊ नका. नाही तर मोठ्या संकटाला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे.

कोणत्या राज्यांना इशारा
आयएमडीने आज देशातील १७ राज्यांना महाअलर्ट जारी केला आहे. दिल्ली, यूपी, बिहार, हरियाणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, असाम, मेघालय आणि केरळमध्ये प्रचंड पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पूर्व भारतात विजांचा कडकडाट आणि वज्रपात होण्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिल्लीत वादळी पाऊस
राजधानी दिल्लीत आज वादळी पाऊस होणार आहे. त्यामुळे दिल्लीकरांना मोठा अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी ताशी ४०-५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय दिल्लीचं कमाल तापमान २७ डिग्री आणि किमान तापमान २५ डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

डोंगराळ भागात दाणादाण
डोंगराळ भागात आज प्रचंड पाऊस होणार असल्याने या भागात दाणादाण उडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात आज शिमला, मंडी, चंबा, सोन, कांगडी, किन्नौर, सिरमौर आणइ ऊना या भागात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी प्रति ताशी ५० ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. मनालीत कमाल तापमान १३ डिग्री सेल्सिअस राहणार आहे. तर किमान तापमान ६ डिग्री सेल्सिअस राहणआर आहे. उत्तराखंडच्या नैनिताल, पिथौरगड, बागेश्वर, चमोली, डेहराडून आणि रुद्रप्रयागमध्येही वादळी पाऊस होणार आहे.

मुंबई, कोकणात मोठा पाऊस
हवामान विभागाने मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यामुळे हवामान ढगाळ आणि दमट राहिलं, मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. मात्रा आता मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. अचानक हवामान बदलल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुसळधार पावसाचा रस्ते, रेल्वे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागात तुरळक सरी पडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.