मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अनुकूल परिस्थितीमुळे मराठवाड्यात पाऊस रिटर्न होण्याचा अंदाज आहे. आज सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी वाढली असून पुढील आठवड्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. खरीप पिके काढण्याच्या बेतात पाऊस पडणार असल्याने शेतकर्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे.
यावर्षी पावसाने मराठवाड्याला तुडुंब भरून टाकले. जून ते सप्टेंबर या काळात सर्व जिल्ह्यात सरासरी सरासरीच्या दीड पट पाऊस झाला. विशेषत: औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. तर अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 25 सप्टेंबर नंतर मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यामुळे शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान पाऊस!
दरम्यान कृषी तसेच हवामान तज्ज्ञ उदय देवळाणकर यांच्या म्हणण्यानुसार अरबी समुद्रात पुन्हा एकदा पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास दोन आठवड्यापूर्वी सुरू झाला असला तरी या अनुकूल परिस्थितीने मराठवाड्यावर पुन्हा एकदा जोरदार पावसाचे ढग घोंगावत आहे. विशेषतः खरीप पिकांच्या काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. अशा वेळी पाऊस पडला तर शेतकर्यांचे मोठे नुकसान होईल, यात शंका नाही. येत्या 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान औरंगाबादसह काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.