औरंगाबाद शहर हे पर्यटनाची राजधानी असताना देखील वारंवार मराठवाड्याला वगळले जात आहेत. आता देखील मध्य रेल्वेने 9 ऑक्टोबर पासून मुबंई, पुणे, नागपूर, गोंदिया आणि सोलापूर या ठिकाणी विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊननंतर सोलापूर, पुणे हा मार्गे रेल्वे सुरू करण्याला प्राधान्य दिले आहे. मात्र मराठवाडा दुर्लक्षितच असल्याने आणखी किती दिवस रेल्वे सुरू होण्याची प्रतिक्षा करावी लागणार? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. लोकप्रतिनिधी कमी पडले असल्यानेच मराठवाड्यात एकही रेल्वे सुरू झाली नसल्याचा आरोप देखील आता प्रवाशांकडून केला जात आहे.
कोरोनामुळे अनेकांचे व्यापार ठप्प झाले आहेत. त्यात दुसरीकडे ट्रान्सपोर्टचा खर्च देखील वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत रेल्वे सुरू झाल्या तर व्यापार्यांना सर्वसामान्य व्यवसायिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु असे असताना देखील मराठवाड्याचा विचार केलेला दिसत नाही. मध्य रेल्वे ने देखील सोलापूर, पुणे या भागात रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्यात रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेणार कधी? आणखी किती दिवस वाट पहावी लागणार आहे? असे अनेक प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.
राजकीय नेते कमी पडले?
कोरोनामुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या आहेत. केवळ अमृतसर-नांदेड आणि नांदेड अमृतसर व परभणी- हैद्राबाद या रेल्वे सध्या धावत आहेत. मात्र जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेस सारख्या रेल्वे देखील सोडण्यात याव्यात अशी मागणी देखील आता केली जात आहेत. असे असताना देखील याकडे दुर्लक्ष केले दिसत आहेत. मराठवाड्यासाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी स्थानिक राजकीय नेत्यांकडून व मराठवाड्यातील नेत्यांकडून करायला हवी होती. लॉकडाऊननंतर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी राजकीय नेते कमी पडले का? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहेत.
रेल्वे सुरू करायला हव्यात: ओमप्रकाश वर्मा
दिवाळी, दसरा तोंडावर असताना आता रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे. नांदेड- मुबंई तपोवन एक्सप्रेस, जालना- मुबंई जनशताब्दी एक्सप्रेस व जालना -मनमाड शटल डेमो सुरू करायला पाहिजे. अशी मागणी मराठवाडा रेल्वे समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांच्यावतीने केली जात आहे.