वीरगावकरांनी पाळला कडकडीत बंद
तालुक्यातील वीरगाव येथे ग्रामस्थांनी अयोध्येतील श्री राम मंदिर भूमिपूजनानिमित्त ठिकठिकाणी घराघरात व गावातील राम मंदिर परिसरात भगवा झेंडा लावला होता; परंतु झेंडा लावण्यावरून वीरगाव पोलिसांनी ग्रामस्थांना दमबाजी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी तहसीलदार व पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या दमबाजी विरोधात आज वीरगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
वीरगाव ग्रामपंचायत व पोलिस ठाणे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वादविवाद सुरू असून, पोलिस वसाहतीचे अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा व येथील भगवा ध्वज काढण्यावरून पोलिसांनी वेळोवेळी ग्रामस्थांवर दबाब आणल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे त्यावेळी पोलिस अधीक्षक व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केला होता. श्री राम मंदिर भूमिपूजनानिमित्त घरावर भगवा ध्वज लावून घरासमोर रांगोळी काढून घराघरात श्री राम प्रतिमेचे पूजन करण्याचे आवाहन सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले होते. त्यानुसार वीरगाव येथेही ग्रामस्थांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळत येथील मंदिर व घराघरात श्री राम प्रतिमेचे पूजन, आरती करून भगवा ध्वज लावण्याचे काम सुरू असताना वीरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी तेथे येऊन भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संभाजी कलापुरे यांना पोलिस ठाण्यात बोलावून दमबाजी केली तसेच ग्रामपंचायतचे अपंग कर्मचारी साईनाथ थोरात, मच्छिंद्र बारसे यांनाही कुठलेही कारण नसताना तू आमच्या कायम विरोधात चालतो, तुझा एक पाय अपंग आहे, दुसराही काढू व तुमच्यावर गुन्हे दाखल करू, असे म्हणत दमबाजी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपसरपंच तथा शिवसेना विभागप्रमुख नानासाहेब थोरात म्हणाले, साथरोग अधिनियमाचा व लॉकडाऊनचा फायदा घेत पोलिस परिसरात अवैध धंद्यांना चालना देत आहेत. त्याला विरोध होऊ नये म्हणून गावात दहशत निर्माण करून मागील काही जुन्या कारणावरून ग्रामस्थांना धमकावत आहेत. याबाबत वरिष्ठांना तक्रार करून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही दाद मागणार आहोत.