मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या

Foto
मुंबई : राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात  काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्यास, मंत्र्याच्या स्वीय सहायकास लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यानंतर, मंत्रालयातल्या आणखी एका अधिकाऱ्याला लाच घेतला लाच लुचपत प्रतिबंधन विभागाने अटक केली आहे. खारघर परिसरात लाच घेताना सापळा रचून एसीबीकडून लाचखोर अधिकाऱ्यास बेड्या ठोकण्यात आल्या. अर्थ व नियोजन विभागात कक्ष अधिकारी म्हणून असणारे विलास लाड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल 6 लाख 37 हजार रुपयांची मोठी लाच घेताना अटकेची कारवाई करण्यात आली. 

मंत्रालयातल्या कामासाठी लाच घेण्याचा प्रयत्न केल्याचं दुसर मोठ प्रकरण समोर आलं असून मंत्रालयातल्या लाचखोरीला चाप बसवण्यासाठी एसीबीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात एसीबीने कारवाईचा धडाका लावला होता, तेव्हा मार्च एन्डमुळे ही कारवाई होत असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होती. मात्र, आता एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एसीबीने पुन्हा एकदा आपला मोर्चा थेट मंत्रालयात वळवला आहे. मंत्रालयातील कक्ष अधिकारी असलेल्या विलास लाड याला रंगेहाथ अटक करण्यात आली. विशेष म्हणजे सर्वसामान्य माणसांचा एका वर्षाचा पगारही नसतो, तेवढी मोठी रक्कम लाच स्वरुपात हा अधिकारी एका दिवसात घेत होता. त्यामुळे, प्रशासन आणि सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार व सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.  

ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करुन देण्यासाठी या अधिकाऱ्याने लाच मागितली होती, त्यानुसार 6 लाख 37 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने लाचखोर आरोपीस अटक केली. खारघर परिसरात एसीबीने ट्रॅप रचून ही कारवाई केल्याने मंत्रालयातील प्रशासकीय वर्तुळात आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे.