बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघातापूर्वी कार्यकर्त्याला केलेला अखेरचा कॉल रेकॉर्ड समोर आला आहे. अपघाताच्या दिवशी सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी दादांचा हा अखेरचा कॉल कार्यकर्त्याला आला होता. हा कॉल रेकॉर्ड बारामतीत पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ऐकवला. विमानातून लँडिंग होण्यापूर्वी अजितदादांचं कार्यकर्त्यासोबत बोलणे झाले होते. कार्यकर्त्याने केलेल्या मेसेजला अजितदादांनी कॉल करून उत्तर दिले होते असं अजित पवारांशी शेवटचा संवाद साधणारे श्रीजित अरविंद पवार यांनी सांगितले.
श्रीजित पवार हे अजित पवारांचे नात्याने चुलत पुतणे लागतात. श्रीजित यांनी अजितदादांना जिल्हा परिषदेच्या उमेदवार निवडीबाबत मेसेज केला होता. हा मेसेज अजितदादांनी बारामतीला विमान आल्यानंतर जेव्हा लँडिंग होणार होते. तेव्हा रेंज येताच वाचला. त्यानंतर लगेच अजित पवारांनी श्रीजित यांना कॉल केला. याबाबत श्रीजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, अजितदादा कायम कामासाठी तत्पर असायचे. सातत्याने काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यानुसार माझा मेसेज पाहिल्यानंतर 8.37 मिनिटांनी कॉल माझ्या नंबरवर आला होता. हा त्यांचा शेवटचा कॉल होता असं त्यांनी सांगितले.
अखेरच्या कॉलवर अजितदादांनी सर्व जातीधर्माला मी सोबत घेऊन जातोय आणि आपण सगळे एकत्र राहतोय. सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू. तू निवांत राहा असं दादांनी म्हटलं. 1 मिनिटांचा हा कॉलवरील संवाद होता असं श्रीजित यांनी सांगितले. हा कॉल रेकॉर्ड ऐकवण्याचा मुद्दा एवढाच की एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने मेसेज केला तरीही दादा तत्परतेने त्यांना कॉल करत होते. फ्लाईटमध्ये असतानाही जसे त्यांना रेंज मिळाली त्यांनी हा कॉल केला असं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं.
अखेरच्या कॉलवर दादा काय बोलले?
अजितदादा - तुम्हाला माहिती नसते, काय नसते..आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा..
कार्यकर्ता - नाही, दादा मला जे वाटले ते तुमच्याशी बोललो
अजितदादा - माहिती आहे, पण तसं नाही, माळी समाजाला मी सुपे गटातून उमेदवारी दिलेली आहे. तिथे ओबीसींचे आरक्षण होते. बाकीच्यांनी दिले नाही. इतर पक्षांनी दुसरेच दिलेत, आपण तसे केले नाही.
कार्यकर्ता - चालेल, दादा तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय घ्या
अजितदादा - ठीक आहे, ओके...
दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी अजित पवार बारामतीला येणार होते. सकाळी मुंबईहून खासगी विमानाने अजित पवार बारामतीला निघाले. मात्र हे विमान बारामतीत लँडिंग होताना त्याचा अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह 4 जणांचा दुदैवी मृत्यू झाला. पण सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी अजितदादांनी कॉलवर कार्यकर्त्याशी संवाद साधला. त्यानंतर 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात झाला.