प्रचंड गदारोळात अखेर 'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी फाडली विधेयकाची कॉपी....

Foto
नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजन अर्थात मनरेगा नाव बदलण्यासह अनेक महत्त्वाच्या तरतुदींमध्ये बदल करणारे 'विकसित भारत-जी राम जी' विधेयक आज लोकसभेत प्रचंड गदारोळात मंजूर करण्याद आले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे विधेयक पटलावर ठेवले होते. दरम्यान, विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत कागदाचे तुकडे भिरकावल्याने सभागृहाचे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

दरम्यान, विधेयकाचे समर्थन करताना शिवराज सिंह चौहान म्हणाले, "मनरेगा योजना भ्रष्टाचाराचा अड्डा बनली होती. नवीन बदलांमुळे या योजनेतील पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचार कमी होण्यास मोठी मदत होईल. राज्य सरकारांचा सहभाग वाढवून ही योजना अधिक प्रभावी केली जाणार आहे. महात्मा गांधींच्या नावाच्या मुद्द्यावर बोलताना चौहान म्हणाले, "रामराज्य हे तर बापूंचेच स्वप्न होते. बापू आजही आपल्या सर्वांसोबत आहेत. यामुळे त्यांचे नाव हटवण्याचा किंवा अपमान करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही."

हे महात्मा गांधींच्या अहिंसेच्या धोरणाविरुद्ध 

दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी विरोधकांना अहिंसेची आठवणही करून देत, "विधेयकाची प्रत फाडणे हे महात्मा गांधींच्या अहिंसेच्या धोरणाविरुद्ध आहे." असे म्हणत शिवराज सिंह यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. या विधेयकावर कडाडून टीका करताना, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या, "हे विधेयक म्हणजे मनरेगा योजना संपवण्याचा एक मोठा कट आहे." याशिवाय, एवढ्या महत्त्वाच्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी सरकारकडून पुरेसा वेळ देण्यात आला नाही, असा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला.

दरम्यान, सभागृहात विरोधकांनी विधेयकाची प्रत फाडून भिरकावल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "आपण सभागृहात जनतेचे मुद्दे मांडायला हवेत. गदारोळ केल्याने आणि विधेयकाची प्रत फाडून फेकल्याने, प्रश्न सुटणार नाही." अशा शब्दात त्यांनी विरोधकांना फटकारले.