बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात

Foto
बीड/लातूर: बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन आणि मावेजा वाटपातील कथित कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास आता थेट जिल्ह्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी आणि बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी लातूरमधील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. एसआयटीने (SIT) दिवसभर केलेल्या कसून चौकशीनंतर ही कारवाई केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी झालेल्या जमीन संपादनावेळी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मावेजात आणि जमिनीच्या मूल्यांकनात प्रचंड फेरफार करून कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीच १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यात पाठक यांच्या नावाचाही समावेश होता.

तपास पथकाचा धडाका
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्याकडे होता. मात्र, सध्या हा तपास एम. व्यंकटराम यांच्या नेतृत्वाखालील पथक करत आहे. पोलिसांनी ठोस पुराव्यांच्या आधारे ही कारवाई केली असून, पाठक यांना ताब्यात घेतल्याने आता या घोटाळ्यातील इतर बड्या माशांचे धाबे दणाणले आहेत.