CBSE चा 'ऑन-स्क्रीन मार्किंग' घोळ, "दोषींना सोडणार नाही..." शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वीकारली जबाबदारी

Foto
नवी दिल्ली : सीबीएसईच्या 'ऑन-स्क्रीन मार्किंग' मूल्यमापन पद्धतीतील त्रुटींवरून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या वाढत्या वादावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. या संपूर्ण प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी, "मूल्यमापन प्रक्रियेत कोणतीही अनियमितता आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही," असे स्पष्ट केले.

नवी दिल्लीत सीबीएसईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, "मी या प्रक्रियेची जबाबदारी स्वीकारतो. यातील त्रुटी सुधारल्या जातील आणि यावर योग्य तो तोडगा काढला जाईल. सध्याच्या स्थितीत राजकारण नंतरही करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा मानसिक ताण आणखी वाढणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

४० कोटी पानांचे डिजिटल स्कॅनिंग

या परीक्षेत एकूण १७ लाख विद्यार्थी बसले होते. त्यांच्या तब्बल ९८ लाख उत्तरपत्रिका सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक उत्तरपत्रिकेत साधारण ४० पाने असतात, म्हणजेच एकूण ४० कोटी पानांचे डिजिटल स्कॅनिंग करण्यात आले आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी 'ऑन-स्क्रीन मार्किंग'  ही पद्धत जागतिक स्तरावर अनेक संस्था वापरत असल्याचे सांगितले. हे मॉडेल पूर्णपणे विद्यार्थी-केंद्रित असून, गुणांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठीच ते डिझाइन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेमका वाद काय आहे? 

सीबीएसईचा निकाल लागल्यानंतर, पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान हजारो विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या.

 अस्पष्ट स्कॅन कॉपी- उत्तरपत्रिकांच्या मिळालेल्या डिजिटल कॉपीज अत्यंत पुसट, अस्पष्ट आणि अपूर्ण होत्या.

 तपासणीत चुका

 अनेक विद्यार्थ्यांचे उत्तर तपासायचे राहून गेले होते, तर काहींना चुकीचे गुण देण्यात आले होते. पीक अवर्समध्ये सीबीएसईचे अधिकृत पोर्टल वारंवार क्रॅश होत होते आणि पैसे भरताना पेमेंट फेल्युअरच्या समस्या येत होत्या.

वाढता वाद पाहता सीबीएसईने उत्तरपत्रिकांच्या स्कॅन कॉपीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवून दिली आहे. तसेच "विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, त्यांच्या शंकांचे निरसन विषय तज्ज्ञांद्वारे केले जाईल," असे आश्वासन बोर्डाने दिले आहे.