विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल भाजप १२, शिवसेना ४ तर राष्ट्रवादीला १ जागा

Foto
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक  जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जून असून २ जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल. तर अर्ज माघारीची मुदत ४ जूनपर्यंत असणार आहे.
 
विधान परिषदेसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून जोरदार तयारी सुरु आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत बैठकांचे सत्र सुरु आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये शिवसेनेला ४, तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एकच जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. हिंगोली-परभणीच्या जागेसंदर्भात शिवसेना ही जागा लढण्याची शक्यता आहे. अशात, शिवसेनेच्या वाट्याला एकूण ४ जागा येणार आहेत. ज्यात, प्रामुख्याने आपल्या पारंपरिक जागा कायम राखण्यात शिवसेनेला यश आले आहे.

महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गची ही एकच जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी-हिंगोलीची जागा जाण्याची शक्यता आहे. पुण्यावर भाजपकडून आपला दावा कायम ठेवण्यात आला आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल होत भाजप १२, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी १ असा झाल्याची भाजपच्या सूत्रांची माहिती आहे. याआधी भाजप १२, शिवसेना ३ तर राष्ट्रवादी २ जागांवर लढणार असल्याची माहिती समोर आली होती. आज किंवा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात बैठक पार पडण्याची शक्यता आहे. अशात, अंतिम निर्णय तिन्ही नेत्यांकडूनच घेतला जाणार आहे.

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या ७५ टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्य संख्येपैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.