मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित चोरी आणि निधीच्या अपहाराचा निषेध करण्यासाठी आज मुंबईतील दादर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून 'रामरक्षा आंदोलन' पुकारण्यात आले आहे. या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील राजकारण कमालीचे तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे स्वतः या आंदोलनात उतरणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंच्या या आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मला आनंद आहे की, शेवटी उद्धवजींना राम आठवले. आमची अपेक्षा एवढीच होती की त्यांना राम आठवले पाहिजे. त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. राम मार्गाने चालले तर त्यांचे भलं होईल. केवळ आजच्या पुरतेच नाही तर त्यांनी रोज रामरक्षा म्हणावी," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
दरम्यान, आज (दि. 5 जुलै) दुपारी 4 वाजता दादर (पश्चिम) येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. 'अब हिंदू माफ नही करेगा' असा आक्रमक नारा देत हे आंदोलन पुकारण्यात आले असून, मुंबईतील दादर प्लाझा, कबुतरखाना आणि कलानगर या परिसरांमध्ये या आंदोलनाचे मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
या आंदोलनाची घोषणा करताना मातोश्री येथील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर बोचरी टीका केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "हिंदू मार नहीं खाएगा, असे एकदा अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. आज मी तसेच म्हणतोय, अब हिंदू माफ नहीं करेगा. जे जे मंदिर लुटत आहेत, हिंदू त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करतो आहोत. राम मंदिर दानपेटीतील या चोरीविरोधात आमची शिवसेना आंदोलन करणार आहे. येत्या रविवारी संध्याकाळी दादर कबुतरखान्याजवळ मारुती मंदिरात रामरक्षा आंदोलन करणार आहोत. जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे रामरक्षा म्हणू, हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालिसा म्हणू," असे त्यांनी म्हटले होते.