चिकलठाणा कचरा प्रक्रिया प्रकल्प चाचणीचा मुहूर्त हुकला!

Foto

औरंगाबाद:  शहरातील कचरा कोंडी फोडण्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या  शहरातील चार प्रक्रिया केंद्रापैकी केवळ चिकलठाणा कचरा प्रक्रिया केंद्र पूर्णत्वास येत आहे. वीज जोडणी अभावी या केंद्रावर कचर्‍यावर  प्रक्रिया होत नव्हती. १५ दिवसात हे काम पूर्ण होऊन २  जून रोजी कचरा प्रक्रिया केंद्राच्या  चाचणी घेण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता.  परंतु काम पूर्ण न झाल्याने हा मुहूर्त हुकला  आहे. गेल्या वर्षी १६ फेब्रुवारी रोजी शहरातील कचरा नारेगाव कचरा डेपोत टाकण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. तेव्हा पासून शहरात मोठ्या प्रमाणात कचरा कोंडी निर्माण झाली होती. 

इंदूरच्या धर्तीवर कचरा कोंडी फोडण्यासाठी मनपाने आराखडा तयार करुन शहरात खासगी ठेकेदारांकडून कचरा संकलन करण्यात येत आहे. तसेच शहरातील चारही भागात चार कचरा प्रक्रिया केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी ९१  कोटी रुपयांच्या खर्चास राज्य शासनाने मंजुरी देऊन हा खर्चही मनपाला दिला. याला वर्ष उलटल्यानंतरही मनपा प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे एकही प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. लोकसभा निवडणुकीत याच मुद्द्यावरून कोंडी झाल्यानंतर विधानसभेच्या दृष्टीनेप्रशासन कामाला लागले होते.पडेगाव, कांचनवाडी, हर्सुल या तीनही प्रकल्पाला पूर्ण होण्यासाठी अजून बराच अवधी लागणार आहे. चिकलठाणा प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यात जमा आहे. 

परंतु  जोडणीअभावी पूर्ण क्षमतेने कचर्‍यावर प्रक्रिया होऊ शकलेली  नाही. चिकलठाण्यात एक्स्प्रेस फिडर बसवण्याच्या कामासाठी एक निविदा महावितरणकडे आली होती. ती अंतिम करून १५ दिवसात वीजजोडणीचे काम पूर्ण होऊन  २  जूनला चाचणी घेण्याचा दावा मनपा प्रशासनाच्या वतीने गेल्या महिन्यात करण्यात आला होता. परंतु वीज जोडणीचे व  ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम बाकी असून, येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरच चाचणी घेण्यात येणार आहे.