मुंबई : राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शासकीय, अनुदानित आणि खासगी सर्व शाळांमध्ये एकसमान नियम लागू होणार आहे.
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या अधिकृत नोंदींमध्ये आता आईचे नाव प्रथम नमूद केले जाणार आहे. आईचे नाव, वडिलांचे नाव आणि त्यानंतर आडनाव असा नवीन क्रम निश्चित करण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. हा नियम सर्व शाळांना लागू असणार आहे.
कशासाठी घेतला निर्णय?
आईच्या योगदानाला योग्य सन्मान देणे, लिंग समानतेला प्रोत्साहन देणे आणि सामाजिक समतोल साधणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.
विभक्त-घटस्फोटित पालक, दत्तक मुलांचे काय?
अशा प्रकरणांमध्ये संबंधित परिस्थितीनुसार योग्य ती नोंद ठेवण्याची तरतूद करण्यात येणार आहे.
येथे झळकेल आईचे नाव
हजेरीपत्रक, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला तसेच प्रवेश निर्गम उतारा या सर्व कागदपत्रांवर आईचे नाव नमूद केले जाईल.
हा निर्णय विद्यार्थ्यांच्या ओळखीत सकारात्मक बदल घडवेल आणि आईच्या भूमिकेला योग्य सन्मान देईल. - संजय जावीर, शिक्षण निरीक्षक