आज औरंगाबादने शहराने शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला. साधारण दुपारी 12.22 ते 12.26 या वेळेदरम्यान सावली आपल्या पायाशी पाहायला मिळत होती. शहरात ब्रेक दि चेनच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यावेळी सिडको चौकात असे दृश्य पाहायला मिळाले.
महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान उत्तर गोलार्धात म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आहे. यामुळे शून्य सावली ही खगोलीय घटना राज्यात मेच्या दुसर्या आठवड्यापासून अनुभवता येते. याची सुरुवात 8 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून झाली. पश्चिम महाराष्ट्रात 10 मे रोजी, तर आज 19 मे रोजी औरंगाबाद, जालना, हिंगोली, चंद्रपूर, या भागात नागरिकांनी शून्य सावलीचा अनुभव घेतला. सूर्याच्या दक्षिण उत्तर अक्षाला पृथ्वीचा दक्षिण उत्तर अक्ष हा 23.5 अंशांनी कललेला आहे. यामुळे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पृथ्वीवरील उत्तर गोलार्ध हा सूर्याकडे झुकलेला असतो तर उर्वरित सहा महिन्यांत दक्षिण गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो. जेव्हा सूर्य दक्षिण गोलार्धात विषुववृत्ताच्या दक्षिणेस 23.5 अंश असतो त्या अक्षांशला मकर वृत्त असे संबोधले जाते. जेव्हा सूर्य उत्तर गोलार्धात विषुववृत्ताच्या उत्तरेस 23.5 अंश असतो त्या अक्षांशला कर्क वृत्त असे संबोधले जाते.