औरंगाबाद: देवगिरी महाविद्यालयाच्या रविंद्रनाथ टागोर सभागृहात पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात जिल्हा परिषदेच्या ३५० विस्तापित शिक्षक-शिक्षिकांचे समुपदेशन शांततेत पार पडले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, शिक्षण अधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल, उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे गटशिक्षण व विस्तार अधिकारी यांची उपस्थिती होती.
सकाळच्या सत्रात ज्यांची पदस्थापना झाली त्यातील काही शिक्षकांनी आमच्यावर अन्याय झाला अशी खंत सांजवार्ता प्रतिनिधीजवळ बोलून दाखवली. पती पत्नी एकत्रीकरण नियमाप्रमाणे आमचे अंतर ३० किलोमीटर पेक्षा अधिक असुनही गुगल मॅपचे अंतर ग्राह्य धरले नाही तर जिल्ह्यामध्ये ते ग्राह्य धरण्यात आले आहे. यापुर्वी ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यातील काही शिक्षक रूजू होण्यासाठी गेले तर तेथे जागाच रिक्त नाही. विस्तापित शिक्षकांची समुपदेशनाची दिनांक २६ जुन ठरली. त्याबाबतचे पत्र २५ जुन रोजी शिक्षणाधिकार्यांनी गट शिक्षणाधिकार्यांना पाठवले त्यामुळे अवघ्या एका दिवसात शिक्षकांना पदस्थापनेची गावे निश्चित करण्यासाठी वेळच मिळाला नाही अशा तक्रारी व्यक्त केल्या.










