नोपूर : नागपूरमध्ये आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राम मंदिर लूट विरोधी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. नागपूरच्या या कार्यक्रमावरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठीच सोनम वांगचुक यांना दडपशाहीने ताब्यात घेण्यात आल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी २१ दिवस उपोषण करणार्या सोनम वांगचुक यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यांना चर्चा करून न्याय देण्याऐवजी, रुग्णालयात बळजबरीने हलवून हुकूमशाहीचा मार्ग सरकारने अवलंबला आहे, असे संजय राऊत म्हणाले.
राम मंदिर चोरांपासून मुक्त करणार
या कार्यक्रमाबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, हे आंदोलन अयोध्या आणि राम मंदिराला चोरांपासून मुक्त करण्यासाठी आहे. हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही याला राजकीय कार्यक्रम मानतो, कारण अयोध्येतील राम मंदिर मुक्तीचा लढा देखील राजकीयच होता.या आंदोलनासाठी सरसंघचालक मोहन भागवत, राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रामरक्षाचे सर्टिफिकेट देणारेच मंदिरात बसलेत
रामरक्षा पठणाच्या गर्दीवर बोलताना राऊत यांनी विरोधकांना फटकारले. जे लोक रामरक्षा म्हणतात, तेच अयोध्याच्या मंदिरात बसले आहेत आणि त्यांनीच तिथे लूट केली आहे. रामरक्षा वाचता येते की नाही, याचे सर्टिफिकेट त्यांनी आम्हाला देऊ नये, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे दुपारी १२ वाजता नागपुरात दाखल होत असून, सायंकाळी ४ वाजता रामनगर येथील राम मंदिरात ते रवाना होणार आहेत. हे आंदोलन मंदिर चोरांच्या विरोधात असल्याचे राऊत यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.