जळगाव : महायुतीचे बरेच मंत्री आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यात दुष्काळ पडला किंवा नाही पडला तरी लोक आम्हा पुढाऱ्यांना शिव्या देतात, असे वक्तव्य शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना केलेलं एक विधान दोन दिवसांपासून चर्चेत आलं होतं. पाटील यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहकार मंत्रीपदाची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात एका जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जामाफीच्या मुद्द्यावरून केलेलं विधान वादात सापडलं. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, अशा आशयाचं विधान बाबासाहेब पाटील यांनी केलं. तसेच, निवडून यायचं असतं म्हणून आम्ही आश्वासनं देत असतो, असंही ते म्हणाले.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा मांडताना बाबासाहेब पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यावर आता चहुबाजूंनी टीका होऊ लागली आहे. ङ्गङ्घलोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्ही तुम्हाला निवडणुकीत काहीही आश्वासनं देतो. लोकांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला काय मागायचंयफफ, असं बाबासाहेब पाटील म्हणाले होते. नंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यांच्या त्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये खान्देश शिक्षण मंडळातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. त्याठिकाणी बोलताना मंत्री पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण करताना चौफेर टोलेबाजी केली. बोलण्याच्या ओघात लोक दुष्काळ पडला तरी पुढाऱ्यांना शिव्या देतात, दुष्काळ नाही पडला तरी शिव्या देतात. शिव्या ऐकणे आम्हा पुढाऱ्यांचा धंदाच आहे. त्यामुळे ज्याला शिव्या ऐकायच्या असतील त्यानेच आमदार व्हावे, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. त्यांच्या या नव्या विधानामुळे सगळीकडे चांगलीच खळबळ उडाली आहे.