नवी दिल्ली, दि.29 (वृत्तसंस्था) : माझ्या देशप्रेमावर कोणी शंका घेऊ शकत नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एकाच कुटुंबातील चार पिढी गरिबीवर चर्चा करत आली आहे. याच लोकांनी 55 वर्षे देशावर राज्य केले. आज पुन्हा ते गरिबीवर बोलत आहेत. त्यांनी आता गरिबांसाठीची योजना जाहीर केली आहे. त्यांचे सरकार येणार नाही, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच ते असे बोलत आहेत. गांधी कुटुंबीय पुन्हा कधीच सत्तेवर येणार नाही, असे भाकीत मोदींनी केले आहे.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकला. तसेच विविध प्रश्नांची उत्तरे दिले. पूर्वीच्या सरकारसाठी (तत्कालीन यूपीए सरकार) संरक्षण करार म्हणजे एटीएम होते, असा आरोप करत देशातील जनतेने मला बहुमताने सत्ता देण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. 2014 च्या तुलनेत विरोधक यावेळी जास्त विखुरले असल्याचेही ते म्हणाले.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी...
माझ्याविरोधात अमर्यादित भाषेचा वापर केला तेव्हा मी त्याचे उत्तर दिले. माझ्यावर 250 कपड्यांचे जोड असल्याचा आरोप केला. पण 250 कोटी चोरण्यापेक्षा 250 जोड कपडे असणे कधीही चांगले. चौकीदारवरूनही माझ्यावर जेव्हा आरोप झाले. तेव्हा मी याचे उत्तर दिले. जेव्हा आम्ही सत्तेवर आलो तेव्हा अर्थव्यवस्था ठीक करण्यावर भर दिला. आधीच्या सरकारने आर्थिक घोटाळे करणार्यांकडे दुर्लक्ष केले. फसवणारे पळून गेले. पण आम्ही सत्तेवर आल्यानंतर कायदाच केला. आमच्या सरकारने 14 हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मल्ल्याने 9000 हजार कोटींना फसवले. फसवणार्यांना आम्ही रस्त्यावर आणले आहे. पूर्वीच्या सरकारसाठी संरक्षण करार म्हणजे एटीएम होते.