नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनाचा कोंडी फोडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. ससंदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांना संसदेचे कामकाज होऊ देण्याची विनंती केली. पण सीजेपी आंदोलकांवरील लाठीहल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनासाठी विरोधक अडून बसले आहेत. गेल्या २० दिवसांपासून गृहमंत्री गायब असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले. अधिवेशन सुरू झाल्यापासून मी दररोज संसदेत येतो हे सांगायलाही शाह विसरले नाहीत. तर त्याचवेळी अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
या पावसाळी अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ दिसला. विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज जवळपास ठप्प झाले आहे. सरकार कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहे. २० जुलै २०२६ रोजी काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. तर पॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर लाठीहल्ला करण्याचे आदेश कोणी दिले याविषयीचे निवेदन केंद्रीय गृहमंत्री जोपर्यंत देत नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही असा पवित्रा विरोधकांनी घेतला. सार्वजनिक परीक्षा (दुरुस्ती) विधेयकावरच विरोधक आणि सत्ताधाार्यांचे एकमत दिसले. तेव्हापासून गतिरोध कायम आहे. कामकाज होत नसल्याने सरकारने आता एक पाऊल पुढे टाकले आहे.
सरकार चर्चेस तयार, विरोधकांवर शाहांचा निशाणा
जेव्हापासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले तेव्हापासून विरोधक ससंद चालूच देत नाहीये. दोन्ही सभागृहात ते कामकाजच होऊ देत नसेल तर तिथे जाऊन कोणी काय करणार? संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे की सीजेपी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला असो वा त्यासंबंधी सर्व विषयावर सरकार चर्चेला तयार आहे. चर्चेसाठी विरोधकांनी तयारी दाखवावी आणि त्यांनी एक वेळ सुनिश्चित करावी. विरोधक हीच मागणी करत होते. आम्ही सुद्धा चर्चेला तयार आहोत. मी सुद्धा सांगितले आहे की, मी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यास तयार आहे. पण विरोधक चर्चाच होऊ देऊ इच्छित नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
आता जनतेने ठरवावे की चर्चेपासून कोण पळ काढत आहे. आज दुपारी ३ वाजेपासून ते उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या चर्चेसाठी आम्ही तयार आहोत. आम्ही सगळ्याचं ऐकून घेऊ. सगळ्यांच्याच प्रश्नांचं उत्तर देऊ. सरकारकडे लपवण्यासारखं काहीच नाही. त्यांना चर्चा का नको, याचीही चर्चा करू, असा चिमटा अमित शाह यांनी विरोधकांना काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपचे, एनडीएचे सरकार प्रत्येक चर्चेसाठी तयार आहे. विरोधकांनी संसदेची कोंडी फोडावी आणि कामकाज सुरळीत होऊ द्यावे अशी मागणी त्यांनी केली. माध्यमातून मी विरोधकांना आवाहन करतो की, त्यांनी अध्यक्षांना पत्र द्यावे, आजपासून तीन वाजता चर्चेला सुरूवात करूयात. उद्या दुपारी ३ वाजता मी चर्चेला उत्तर देईल असे अमित शाह यांनी सांगितले.