औरंगाबाद: औरंगाबाद मध्ये झालेल्या निसटत्या पराभवाने घायाळ झालेल्या शिवसेनेने सामानाच्या संपादकीय मधून एमआयएमवर निशाणा साधला आहे. संभाजीनगर मध्ये झालेल्या एका पराभवाने संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनला नाही. औरंग्याच्या टोळक्यात घुसून मारण्याची हिम्मत आजही शिवसेनेत असल्याचे सामानाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
औरंगाबाद महापालिकेत एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून झालेल्या राड्यावर या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले तेव्हाच्या शहराच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृतीस धक्का बसला असून पुढे आता काय घडेल याची प्रचिती गुरूवारच्या प्रकारावरून दिसून येत असल्याची टीकाही त्यातून करण्यात आली आहे.
काय म्हटलय अग्रलेखात?
जेथे औरंग्यास गाडले किंवा पुरले त्या संभाजीनगरात हिरव्या विषाला पुन्हा उकळी फुटली आहे. महाराष्ट्रातच काय, संपूर्ण देशभरात हिंदुत्वाची लाट उसळली असताना लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरचा निर्णय विचित्र लागला. गेली ३० वर्षे संभाजीनगरवर डौलाने फडकणारा भगवा उतरवणारे हात आपल्यातल्याच सूर्याजी पिसाळांचे होते. हैदराबादच्या ओवेसी पक्षाचे इम्तियाज जलील विजयी झाले तेव्हाच संभाजीनगरच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृतीस धक्का बसला. यापुढे काय घडणार आहे त्याचे प्रात्यक्षिक संभाजीनगर महापालिकेत गुरुवारी झालेल्या राड्यावरून स्पष्ट झाले.