हैदराबाद गॅजेट दिशा दाखवणारे आहे, मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र बसावे : शरद पवार

Foto

कोल्हापूर  : शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भातलही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, हैद्राबाद गॅजेट एक दिशा दाखवत आहे. मला याची कॉपी मिळाली आहे. सामंजस्य राहावं, एकीची वीण कायम रहावं हे सगळ्यांनाच वाटतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहावे यासाठी प्रयत्न करावेत. कारण गावागावात कटुता निर्माण झाली आहे आणि हे घातक नक्कीच आहे. विखेंच्या समितीमध्ये सगळ्या जातीचे सदस्य आहेत. दुसरीकडे, बावनकुळे यांच्या समितीत सगळे ओबीसी सदस्य आहेत. अशात सामाजिक कटुता कशी कमी होईल. राज्याच्या हितासाठी असलेल्या मार्गाने जावं लागेल. हाके किंवा आणखी लोक काही बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कटुता निर्माण झाली आहे. कटुता इतकी निर्माण झाली आहे की, एकमेकांच्या व्यवसायाकडे लोक जात नाहीत. हे चित्र महाराष्ट्रात कधीही नव्हतं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.


देवाभाऊच्या जाहिराती पाहिल्या, मी वेगळा विचार करतो..

देवाभाऊ जाहिराती पाहिल्या तर त्या खासगी दिसत आहेत. सरकारी जाहिराती फार कमी आहेत. देवाभाऊ म्हणून ज्या जाहिराती आल्या आहेत त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची भावना व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कृतज्ञता व्यक्त करणं हे प्रत्येकाचं कामच आहे, मात्र मी वेगळा विचार करतो असं शरद पवार म्हणाले. शरद पवार पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, शेतकरी संकटात आहेत. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या आहेत. सोयाबीनसारखी पिकं उद्ध्वस्त झाली. शिवछत्रपतींकडे जेव्हा राज्य होतं तेव्हा दुष्काळ पडला होता. त्यावेळी दुष्काळ पडल्यानंतर पाऊस आला पण शेतकऱ्यांकडे साधनं नव्हती. त्यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या संपत्तीतून सोनं बाहेर काढलं आणि सोन्याचा फाळ केला आणि संदेश हा दिला की शेतकऱ्याची जमीन नांगरल्याशिवाय राहता कामा नये. त्यासाठी त्यांनी सोन्याचा फाळ करुन दिला. शिवाजी महाराजांचा शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा होता हे समजतं आहे. आज घडीला अतिवृष्टी, जमीन वाहून जाणं, शेतकऱ्यांचं नुकसान असं सगळं झालं आहे. आता शेतकरी नुकसान भरपाई मिळण्याची वाट पाहतो आहे. देवाभाऊंनी या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच 


दरम्यान  शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केले. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र निवडणुका लढतील, अशी चर्चा आहे आणि तसे संकेतही त्यावर शरद पवार यांनी मोठे भाष्य केलं आहे. शरद पवार म्हणाले की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे. महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही. दोघांचीही मुंबईत ताकद आहे त्याचा आम्हाला फायदा होईल. आगामी काळातील महापालिकेच्या निवडणुका मनसे आणि उबाठा गट एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे. दोघे भाऊ एकत्र येऊन आपआपल्या पक्षाची ताकद दाखवतील. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं समीकरण बघायला मिळेल.”