नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला २२ एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्षापूर्वी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या नरसंहारामुळे तेथील ओस पडलेली पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांनी गजबजली आहेत. पहलगाममध्येही त्यांची रीघ लागली आहे. अस्थिरता माजविण्याचा प्रयत्न करणार्या पाकला भारतीयांनी लगावलेली ही सणसणीत चपराक आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट करत देशाच्या शत्रूंना स्पष्ट शब्दांत संदेश दिला आहे.
कोणीही मर्यादांचे उल्लंघन केल्यास त्याला ठोस प्रत्युत्तर दिले जाईल अशा इशारा भारतीय लष्कराने पाकिस्तानचे व दहशतवाद्यांचे नाव न घेता दिला. पहलगाम हल्ल्याला वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला भारतीय लष्कराने म्हटले आहे की, दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारतीय जनता एकजुटीने सहभागी झाली.
भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही
गेल्या वर्षी याच दिवशी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात नाहक बळी ठरलेल्या निष्पाप जीवांचे स्मरण करत आहोत. त्यांना कधीही विसरले जाणार नाही. या दुःखाचा सामना करत असलेल्या शोकाकुल कुटुंबांच्या दुःखातही सहभागी आहे. एक राष्ट्र म्हणून, आम्ही या शोकाच्या प्रसंगी आणि आमच्या निर्धारात एकजूट होऊन उभे आहोत. भारत कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांचे हे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, पर्यटकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील सरकार, अधिकार्यांनी सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांच्या मदतीने गेल्या वर्षभरात मोठे प्रयत्न केले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून, भारतासह जगभरातून पर्यटक पुन्हा काश्मीरमध्ये येच आहेत. गेल्या महिन्यात देशभरातून ३.८ लाखांहून अधिक पर्यटकांनी श्रीनगरमधील प्रसिद्ध इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डनला भेट दिली. पहलगाम हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या २६ जणांची नावे कोरलेले एक स्मारक तेथील नदीकाठी उभारण्यात आले असून, तिथे आता पर्यटक थांबून येथे श्रद्धांजली अर्पण करतात.