मुंबई : काल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. आज, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी काही महिलांना घरगुती चक्की दिल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यांनी पक्ष फोडीवर केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सरकारच्या ऑपरेशन टायगरबाबत बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, त्यांना तेवढच करायचे आहे. दुसरे पक्ष फोडायचे. त्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. दुसर्यांची मुलं चोरण्यापेक्षा भारती जनता पक्ष, विश्व हिंदु परिषदेत काम करणारी खूप चांगली मुलं आहेत, होती. कुठे आहेत ती आता? त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का दुसर्यांच्या आतापर्यंत? तिथे ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला, इथे उद्धवचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला. त्याच्यापेक्षा आता तुम्ही आम्ही कसं आमचा पक्ष फोडल्यानंतर आमची नवीन मुलं उभी करतो. अरे तुम्ही तेवढं तर दाखवा. करा चांगली मुलं. ती पण काम करणारी असतात. त्यांना मोठं करा तुम्ही.
पेट्रोल १०० रुपयांच्या वरती गेलंय. ज्या समस्येसाठी भाजप रस्त्यावर येऊन आंदोलन करत होती १२ वर्षांपूर्वी त्याच्याबद्दल कोणी चकार शब्दही बोलायला तयार नाहीये. मला तर तुम्हाला एक नवीन सांगायचं आहे. माझ्याकडे काल एक ज्वेलर्स आले होते. ते कोकणात राहतात, मराठी आहेत त्यांनी सांगितली चिपी एअरपोर्ट बंद झाले. तुम्ही कोणीच यावर आवाज उठवत नाही. एवढे कोटी आणि आपल्या टॅक्सचे पैसे खर्च करुन मोदी साहेब आल्या पासून किती नवे एअरपोर्ट झाले आणि त्यामध्ये किती बंद झाले असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, एक एअरपोर्ट बांधायचे असेल तर साधारण ४०-५० हजार कोटी खर्च येतो. आता इथे नवी मुंबईला एअरपोर्ट झालं आहे, आता पुन्हा पुरंदरला एअरपोर्ट करतायेत. पुण्याला एअरपोर्ट आहे. एवढी हवाई दळणवळण कुठे चालू आहे? म्हणजे एअरपोर्ट ५० हजार कोटी खर्च करुन बांधायचे, एखाद दोन विमानं उतरवायची आणि बंद करायची. चीपीची सगळी विमानं फुल जातायेत, एकही रिकामे विमान जात नाही. पण तरी सुद्धा बांधला आणि बंद केला. गोव्याचे टूरिझमचे लोक कमी झाले. म तुम्ही बांधताय कशाला? पैसे आपले आहेत सगळ्यांचे. तुम्हीपण माहिती काढून आवाज उठवला पाहिजे. ती तुमची जबाबदारी आहे की सरकार आपले पैसे कुठे खर्च करतंय चुकीचे?