प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिली पाहिजे असे नाही, तसे असेल तर सुनेत्राताई आमच्याशी चर्चा करतील दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बोलले मुख्यमंत्री...

Foto
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्यासोबत बैठका झाल्याचे बोलले जात आहे. सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील, तर अजूनही वेळ गेलेली नाही, असे विधान करत आमदार सुनील शेळके यांनी विलीनीकरणाचे संकेत दिले. यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही पक्षाचे विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
 
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. भोंदू अशोक खरात प्रकरणातील तपासावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकरणाची सध्याची स्थिती काय आहे, हे मला माहिती नाही. जी काही चौकशी सुरू आहे, ती निष्पक्षपणे सुरू आहे. दररोज अशा प्रकरणांची माहिती दिली जात नाही; आवश्‍यकता असल्यासच आम्ही माहिती घेतो. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू असून, योग्य वेळी त्याबाबतची माहिती दिली जाईल, असे त्यांनी नमूद केले. 

ते आमच्याशी चर्चा करतील
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याबाबत फडणवीसांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. मला असे वाटते की, कुठली परिस्थिती नाही की, मी त्यावर भाष्य केले पाहिजे. त्यांचे आपापसात कोणी बोलले असेल तर मला असे वाटते की, शेवटी कसे आहे की, सुनेत्राताई पवार यांचे काय मत असेल, वरिष्ठ नेत्यांचं काय मत असेल तर ते आमच्याशी चर्चा करतील. प्रत्येक गोष्टीवर आम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजे असे काही कारण नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

दरम्यान, पेट्रोल पंपावर स्थिती सामान्य आहे, यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता, कोणीही अफवा पसरवू नये. ज्यावेळी लोकांनी रांगा लावल्या होत्या तेव्हा सांगत होतो, रांगा लावू नका. तरीही काही लोक अफवा पसरवत होते. आता अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे, त्यामुळे रांगा लागणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.