सिंधुदुर्ग : कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास स्वत:कडे घेतला आहे. कोरेगाव-भीमाचा नाही, असं सांगतानाच कोरेगाव-भीमात दलित बांधवांवर अत्याचार झाला असून हा तपास केंद्राकडे कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास स्वत:कडे घेतला आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा तपास काढून घेतलेला नाही. माझ्या दलित बांधवाचा जो विषय आहे तो भीमा कोरेगावबाबत आहे आणि भीमा कोरेगावचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही, तो केंद्राकडे देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक पार पडली होती. त्यात एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणावर चर्चा झाली. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेवर नाराज असल्याचंही बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे एल्गार परिषद प्रकरणावरून राष्ट्रवादी काय भूमिका घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.