गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवलं; हा हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? : सतेज पाटील

Foto
मुंबई : नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देण्यात आलेल्या दैनिकांमधील जाहिरातीवरून चांगलाच वाद पेटला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पांना थेट सांताक्लॉजच्या रूपात दाखवल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या जाहिरावरून हल्लाबोल करताना निवडणुकांसाठी “हिंदुत्व” जपणाऱ्या भाजप सरकारने हिंदू भावनांशी केलेला खेळ निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. हिंदू संस्कृतीचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा आव दाखवणाऱ्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.

हा हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का?  
सतेज पाटील यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, हिंदू संस्कृतीचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा आव दाखवणाऱ्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा पहा. सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीत महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना थेट सांताक्लॉजच्या रूपात दाखवले आहे. हा प्रकार हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सरकारचा पीआर करण्यासाठी दैवतांचे रूप बदलणे, हेच का स्वयंघोषित संस्कृती रक्षकांचे कर्तव्य? श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक अस्मिता यांचा बाजार मांडून पीआर करण्याची ही वृत्ती आजची नाही. निवडणुकांसाठी “हिंदुत्व” जपणाऱ्या भाजप सरकारने हिंदू भावनांशी केलेला खेळ निषेधार्ह आहे.

बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाटला, मनसेचाही हल्लाबोल
दुसरीकडे, मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनीही या प्रकारावरून हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की,  गणपती बाप्पाला सांताक्लॉजच्या वेशात दाखवलेली केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने दिलेली ही जाहिरात पाहून तीव्र संताप होत आहे. काल दिवसभर भाजपचे लोक विविध ठिकाणी ख्रिसमस साजरा करणाऱ्या लोकांना मारहाण करत होते. तर दुसरीकडे मोदी स्वतः चर्च मध्ये जाऊन ख्रिसमस साजरा करत होते.

एकीकडे बोंब मारायची आणि पंतप्रधानांनी स्तुती करायची
स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजपला खरंच हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही. गणपती बाप्पाचा असा अपमान करायचा नालायकपणा करून त्यांनी हे सिद्ध केलं आहे. त्यांच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाटला आहे. एकीकडे ख्रिश्चन मिशनरी धर्मांतर करून घेत आहेत, अशी बोंब मारायची आणि पंतप्रधानांनी त्यांची स्तुती करायची. हा निव्वळ हिंदूंच्या भावनेचा अपमान आहे. सत्तेसाठी लोकांना हाणामाऱ्या करायला लावणारी भाजप आता हिंदूंच्या देवांचा अपमान करतेय. केंद्र सरकारने त्वरित सर्व हिंदूंची माफी मागावी.