'मराठा समाजाला कोणाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न झाला तर त्याला महाराष्ट्रात फिरता येणार नाही!'

Foto

औरंगाबाद – मराठा समाजाने कोणत्याही राजकीय पक्षाची स्थापना केलेली नसून, पाडव्याच्या दिवशी स्थापन झालेला पक्ष हा संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. मराठा समाजाला कोणाच्या दावणीला बांधण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याला महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल, असा इशारा क्रांती मोर्चाच्या बैठकीत देण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचा पहिला मुकमोर्चा औरंगाबादमध्ये निघाला होता, यामुळे येथे झालेल्या बैठकीत नव्याने स्थापन झालेल्या पक्षावर होत असलेले आरोप हे गंभीर आहेत. मराठा समाजाचे किंवा क्रांती मोर्चाचे नाव घेऊन यापुढेही कोणी पक्ष स्थापनेचा प्रयत्न करु नये असेही यावेळी बजावण्यात आलेे.

कोणी केली पक्षाची स्थापना

मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा संघटनांचा विरोध डावलून सुरेश पाटील यांनी मराठा समाज पक्षाची स्थापना केली आहे. पाडव्याच्या मुहुर्तावर पाटील यांनी रायरेश्वर मंदिरात नव्या पक्षाची स्थापना केली. काही वृत्तवाहिन्यांनी मराठा समाजाचा हा पक्ष असल्याचे म्हटले होते. हे वृत्त खोटे असल्याचे औरंगाबाद येथील बैठकीत सांगण्यात आले.

कोण-कोण होते बैठकीला

औरंगाबाद येथे झालेल्या  बैठकील मराठा आरक्षणाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, विजय काकडे, सुनील कोटकर, अंकित चव्हाण, अड. सुवर्णा मोहिते, संजय तांबे, नितीन कदम, निलेश ढवळे, शिवाजी जगताप, राहुल बनसोड, रविंद्र वाहटुळे, रेखा वाहटुळे, अमोल साळुंके कल्याण शिंदे उपस्थित होते.

मराठा क्रांती मोर्चाने पक्षाचे नाव मराठा क्रांती पक्ष किंवा सकल मराठा पक्ष असे ठेवण्यास सातत्याने विरोध केला आहे. मराठा क्रांती मोर्चा व मराठा या नावांमागे मराठा समाजाची अस्मिता दडलेली आहे. यामुळे या शब्दांचा वापर आपल्या राजकीय स्वार्थासाठी कोणी करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नसल्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कोणी राजकीय पक्ष काढणार असेल तर समाजाला त्यांचा गांभीर्याने विचार करावा लागेल. ही नामुष्कीची वेळ कोणीही आपल्यावर येऊ देऊ नये, असा इशारा बैठकीत देण्यात आला आहे. मराठा समाज साडे तीनशे वर्षानंतर एकजूट झाला असल्याचे सांगत मराठा क्रांती मोर्चाचे नेते म्हणाले, राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला हा समाज  आहे. दुर्देवाने तो आपल्याच समस्यांमध्ये गुंतलेला असल्यामुळे त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करण्याचा कोणी प्रयत्न करु नये. मराठा समाज कोणाच्या दावणीला बांधण्याच जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल, असा इशारा देण्यात आला.