मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. या चर्चेत भाजपने शिंदे गटाची कोंडी केल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाने १२५ जागांची मागणी केली आहे. तर, भाजपने पहिल्याच बैठकीत ५२ जागा देऊ केल्या आहेत. भाजपने शिंदे गटाच्या इतर जागांवरील दावे अमान्य केले आहेत. अशातच आता शिंदे गटात अस्वस्था वाढली आहे. मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घ्यावा, असा दबाव वाढू लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दबावानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक भूमिकेत आली आहे. सन्मानजनक जागावाटप न झाल्यास मुंबईतील सर्व २२७ जागा स्वबळावर लढवण्याचा पर्याय खुला ठेवावा, असा दबाव पक्षातील पदाधिकारी आणि नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टाकत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीतील जागावाटपासाठी मोठ्या प्रमाणात तडजोड केली, मात्र आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हक्काच्या आणि अपेक्षित जागांसाठी कोणतीही तडजोड करू नये, अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे. महापालिका ही पक्षाच्या संघटनात्मक ताकदीची खरी कसोटी आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचा सन्मान अबाधित राहिला पाहिजे, अशी स्पष्ट मागणी नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
शिंदे गटाकडे इच्छुकांची मोठी गर्दी...
मुंबई महापालिका निवडणूक उमेदवार निवडीच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. मंगळवारी २२७ जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पहिल्याच दिवशी तब्बल २,४०० इच्छुकांनी मुलाखती दिल्याने पक्षातील उत्साह आणि तयारी स्पष्ट झाली आहे.
पदाधिकारी आक्रमक, शिंदे काय म्हणतात?
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेते आणि पदाधिकार्यांना श्रद्धा आणि सबुरी राखण्याचा सल्ला दिला आहे. ङ्गङ्घकेंद्रात एनडीए आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील जागावाटपाचा प्रश्नही माझ्यात आणि देवेंद्रजी यांच्यात चर्चेतूनच सुटेल,फफ असे आश्वासन शिंदे यांनी दिले आहे. चर्चेच्या माध्यमातून सकारात्मक तोडगा नक्कीच निघेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी नेत्यांकडे व्यक्त केला असून, अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपने एकनाथ शिंदेंची ८४ जागांची मागणी धुडकावली
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपासाठी गुरुवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २०१७ साली जिंकलेल्या ८४ जागांवर आपला दावा सांगितला. मात्र, भाजपने शिंदेसेनेची ही मागणी सपशेल धुडकावून लावली. भाजपने २०१७ मध्ये शिवसेनेने जिंकलेल्या ८४ जागा यंदाही शिंदे गटाला सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत शिवसेनेने शिंदे गटाला मुंबईत फक्त ५२ जागा देऊ केल्याची चर्चा होती. मात्र, कालच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेनंतर दोन्ही पक्षांनी ही बाब नाकारली होती. परंतु, जागावाटपात शिंदेंच्या शिवसेनेला प्रत्येक जागेसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे दिसत आहे. जागावाटपच्या दुसर्या बैठकीनंतर शिवसेना-भाजपने १५० जागांवर एकमत झाल्याचे सांगितले असले तरी शिवसेनेला हव्या असलेल्या जागा भाजपकडून सोडल्या जाताना दिसत नाहीत.