एलनिनोमधून कुणाचीच सुटका नाही,भारतावर येणार मोठं संकट

Foto
मुंबई : एल निनो ही हवामानात मोठे बदल घडवणारी नैसर्गिक घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिझनेस लाइनने दिलेल्या वृत्तानुसार, २०२६ च्या उत्तरार्धात ही घटना पुन्हा सक्रिय होऊ शकते. यामुळे भारतासह आशियातील अनेक देशांमध्ये पाऊस कमी होण्याची आणि तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विशेषतः शेती क्षेत्रासाठी ही परिस्थिती चिंतेची ठरू शकते.

एल निनो म्हणजे नेमकं काय?
एल निनो ही पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या तापमानात होणार्‍या बदलांशी संबंधित घटना आहे. जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढते, तेव्हा हवामानाच्या पॅटर्नमध्ये बदल होतात. यामुळे काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टी होते. याउलट ङ्गला निनोफ या घटनेत समुद्राचे तापमान कमी होते आणि काही ठिकाणी जास्त पाऊस पडतो.

भारतावर काय परिणाम होऊ शकतो?
भारतामध्ये शेती मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर अवलंबून आहे. जर एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले, तर पिकांचे उत्पादन घटू शकते. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्यास महागाई वाढू शकते. त्यामुळे सामान्य नागरिकांनाही त्याचा फटका बसू शकतो.

इतर देशांमधील परिस्थिती
एल निनोचा परिणाम फक्त भारतापुरता मर्यादित नसतो. आग्नेय आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्येही कमी पाऊस आणि दुष्काळाची शक्यता वाढते. या भागांमध्ये शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असल्याने उत्पादन घटू शकते. दुसरीकडे, अमेरिकेच्या काही भागांमध्ये या काळात चांगला पाऊस पडण्याची शक्यता असते. त्यामुळे तेथील शेतीला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसानही होऊ शकते.

आधीच्या एल निनोचे परिणाम
इतिहासात एल निनोमुळे मोठे परिणाम दिसून आले आहेत. २०१५-१६ मध्ये आलेल्या एल निनोमुळे भारतात मान्सून कमकुवत झाला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. १९९७-९८ मधील एल निनो हा सर्वात तीव्र मानला जातो. त्या वेळी काही देशांमध्ये दुष्काळ, तर काही ठिकाणी पूर आले होते. याचा मोठा परिणाम शेती आणि अर्थव्यवस्थेवर झाला होता.

काय काळजी घ्यावी लागणार?
तज्ञांच्या मते, एल निनोची तीव्रता किती असेल यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. त्यामुळे सरकार आणि शेतकर्‍यांनी आधीच तयारी करणे आवश्यक आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन, कमी पाण्यात येणार्‍या पिकांची निवड आणि साठवणूक यावर लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच, हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीचे नियोजन केल्यास नुकसान टाळता येऊ शकते.