औरंगाबाद महानगरपालिका अक्षरशः कुटुंब कबिल्याचीच बनली आहे. गेल्या दहा वर्षात तब्बल 30 परिवार मनपात ठाण मांडून आहेत. कधी पत्नी, मुलगा, तर कधी स्वतः ! अशा स्वरूपाचे राजकारण इथे चालते विकास गेला खड्ड्यात अन यांच्या गाड्या जोरात... अशी एकंदर परिस्थिती आहे. महानगरपालिकेच्या गुळाला चिटकलेले हे मुंगळे आता खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आहे. जनतेनेच आता हवे... सारे नवे... असे राजकीय पक्षांना ठणकावून सांगितले पाहिजे.
सत्तेच्या गुळाला चिकटलेला मुंगळा अशी उपमा दिल्याने डॉक्टर कराड यांच्या गाडीवर हल्ला झाला. खरे तर शहराची भविष्य वाहिनी असलेल्या महानगरपालिकेतील गुळाला वर्षानुवर्षे असेच मुंगळे चिटकलेले आहेत. याच गुळाच्या ढेपीवर गब्बर होऊन आता पुन्हा एकदा तिसर्यांदा तयारी करीत आहेत. राजकीय पक्षही या नेत्यांचे अक्षरश: बटीक बनले आहेत. आता जनतेनेच हे शोषणकर्ते त्यांना खड्यासारखे बाजूला फेकावेत. नव्या दमाच्या तरुणांना संधी द्यावी. यातच शहराचे भले आहे.
महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरू झाला आहे. राजकीय पक्षांनी नवे चेहरे द्यावेत असा दबाव यायला हवा. महानगरपालिकेच्या 115 नगरसेवकांपैकी तब्बल 30 नगरसेवकांचे दहा वर्षांपासून मनपावर अधिराज्य सुरू आहे. अशा कुटुंब कबिल्यात महानगरपालिका अडकली आहे. या फॅमिली ड्रामा पासून आता शहरवासीयांना मुक्ती हवी असेल तर आता हवे... सारे नवे.. अशी घोषणाच जनतेने दिली पाहिजे.
रस्त्यावरील खड्डे, जागोजागी साचलेला कचरा, पाणी टंचाई अशीच ओळख शहराची बनली आहे. राजकारणी मंडळी पैशाच्या जोरावर निवडून येते. कंत्राटदार बनतात अन महानगरपालिका प्रशासनाला बोटावर नाचवतात. कोट्यवधींची खजिना आपल्या ताब्यात घेतात. पाच वर्षे जनतेला कवडीची किंमत न देणारी ही मंडळी प्रत्येक निवडणुकीला पुन्हा मांड ठोकून मैदानात उतरते. राजकीय पक्षांना बटिक बनवणार्या या मंडळींना आता थांबा म्हणण्याची वेळ आली आहे.
शहरातील खैरे, तनवाणी, बारवाल, घडामोडे, जैन, देसरडा, तुपे, गांगवे आदी नामवंत घराण्याबरोबरच राजगौरव वानखेडे, राजू शिंदे, रूपचंद वाघमारे, कैलास गायकवाड, नासीरखान, सुरेंद्र कुलकर्णी, राजू वैद्य, प्रमोद राठोड आता पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.