मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पक्षांतर्गत गटबाजीमुळे क्षीरसागर नाराज होते. जयदत्त क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून पाच दशकांपासून जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा दबदबा आहे.
जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले होते. एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच क्षीरसागर हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. अखेर आज ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेत्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी जवळीक साधत क्षीरसागर बंधूंनी भाजपाशी अप्रत्यक्ष राजकीय युतीच केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर कार्यक्रम घेतल्याने क्षीरसागर भाजपात प्रवेश करतील असे कयास बांधले गेले. मात्र, मुंडे आणि क्षीरसागर हे दोघेही ओबीसी समाजाचे नेते आहेत. त्यामुळे क्षीरसागर यांनी शिवसेनेचा पर्याय निवडून पंकजा मुंडे यांच्यासोबतचा संघर्ष टाळला आहे.