केंद्र.सरकारने पाठवलेले व्हेंटिलेटर्स खराब असल्याचा कांगावा चुकीचा असून अशा प्रकारचे राजकारण या काळात तरी करू नये, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आमदार अतुल सावे यांनी तयार केलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज सकाळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी मराठवाड्यातील संसर्गाची पातळी आणि उपाययोजना याबाबत चर्चा केली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, औरंगाबादेत संसर्गाचा दर चाळीस टक्क्यांहून आता 21 टक्क्यांवर आला आहे. औरंगाबाद आणि लातूरचा संसर्ग दर कमी झाला असला तरी बीडमध्ये मात्र हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या जिल्ह्याकडे लक्ष देण्याची सूचना केल्याचे फडणवीस म्हणाले. ऑक्सीजनच्या बाबतीतही औरंगाबादेत चांगले काम झाले आहे. तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या बाबत काही प्रोटोकॉल तयार करण्याची सूचना त्यांनी आयुक्तांना केली
सर्वाधिक लसी महाराष्ट्रात!
राज्यात लसींच्या तुटवड्याने लसीकरण थांबल्याचे लक्षात आणून दिले असता ते म्हणाले, केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला दिल्या आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या वाट्याला जास्त लसी आल्या. केंद्र सरकार यापुढे लसीचे उत्पादन वाढणार असून डिसेंबरपर्यंत 200 कोटी लसी तयार करण्याचे नियोजन असल्याचे फडणवीस म्हणाले. व्हेंटिलेटरच्या विषयावर राजकारण करू नये. केंद्र सरकारने राज्याला 5 हजार व्हेंटिलेटर दिले होते. मात्र अनेक ठिकाणी ते पडून राहिल्याने अडचणी आल्या असतील. ज्योती कंपनीच्या व्हेंटिलेटर्स मध्ये प्रॉब्लेम असल्याचे समजते. जे काही चुकीचे असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे.