मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा होण्यास सुरुवात झाली असून भाजपनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांचं नाव विधानपरिषदेचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत होतं. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्यांनाच आग्रह केला जात होता. मात्र, अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिल्याने आता सस्पेन्स संपला आहे.
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने 6 उमेदवार जाहीर केल्यानंतर आता ठाकरे गटानेही सस्पेन्स संपवला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जागी आता अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनीच विधानपरिषदेवर जावं अशी महाविकास आघाडीतील नेत्यांची इच्छा होती. त्याबाबत ठाकरे गटातील नेत्यांनीही उद्धव ठाकरेंच्याच नावाचा आग्रह धरला होता. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी आपलं वजन अंबादास दानवे यांच्या पारड्यात टाकल्यामुळे, आता ते ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार असतील. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अंदाबास दानवे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळं संपल्याने त्यांच्या जागी कोण जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती.
विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे.
महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 9 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.
भाजपकडून विधानपरिषदेसाठी 6 उमेदवारांची यादी
दरम्यान, कालच भाजपने विधानपरिषदेसाठी 6 उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधानपरिषदांच्या जागेसाठी पाच नावांची घोषणा केली. तर, विधानपरिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी एक म्हणजेच एकूण 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपचे उमेदवार
सुनील कर्जतकर,
माधवी नाईक,
संजय भेंडे,
विवेक कोल्हे
प्रमोद जठार
प्रज्ञा सावंत
विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026