आता राज्यसभेची लाढाई, आघाडीकडे जागा एक तर दावेदार अनेक, महायुतीचे खासदार वाढणार, शरद पवारांसह सहा नेत्यांचा कार्यकाळ संपणार

Foto
मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागा लवकरच रिक्त होणार असून, त्यासाठी होणार्‍या निवडणुकीत राज्यातील राजकीय समीकरणे बदललेली दिसणार आहेत. सध्याच्या विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट फायदा होण्याची  शक्यता असून, महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. २ एप्रिल रोजी राज्यातून निवडून गेलेले सात राज्यसभा खासदार निवृत्त होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे डॉ. भागवत कराड आणि धैर्यशील पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, उद्धव ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या फौजिया खान यांचा समावेश आहे. या सर्वांची मुदत संपल्यानंतर तातडीने नव्या निवडणुका होणार आहेत.

२०२० मध्ये या सात जागांसाठी निवडणूक झाली होती, तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या काळात विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर महाविकास आघाडीने चार जागा जिंकल्या होत्या. मात्र, सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. सत्तांतरानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आमदारसंख्येचे गणित मोठ्या प्रमाणात ढासळले आहे. विधानसभेतील बदललेल्या आकड्यांमुळे महाविकास आघाडीला यावेळी चार जागा मिळवणे शक्य नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. उपलब्ध संख्याबळ पाहता, आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागू शकते. दुसरीकडे, भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांची ताकद वाढल्याने बहुतेक जागांवर त्यांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभेची ही निवडणूक केवळ जागांची नसून, ती राज्यातील बदललेल्या राजकीय शक्तिसमीकरणांचे प्रतिबिंब मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सत्ताधारी तसेच विरोधकांचे लक्ष लागून राहिले आहे. पुढील काही दिवसांत उमेदवारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. 

राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता 

राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उर्वरित ६ जागा महायुतीच्या वाट्याला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवारांच्या निधनानंतर सध्याच्या बळानुसार १ जागा तर शिवसेनेला देखील १ जागा आणि उर्वरित ४ जागा भाजपच्या वाट्याला जाणार आहेत. विधानसभेतील सध्याच संख्याबळ पाहता राज्यसभेसाठी उमेदवाराला ३७. ५ मतांची गरज असल्याची सूत्रांची माहिती आहे, महाविकास आघाडीच्या ३ जागा महायुतीच्या पारड्यात पडणार आहेत, तर एप्रिल महिन्यात  शरद पवार, काँग्रेसच्या रजनी पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या फौजिया खान हे देखील निवृत्त होत आहे. तर, महायुतीमधील मंत्री रामदास आठवले, भागवत कराड, धैर्यशील पाटील, हे निवृत्त होत आहे.

शरद पवार यांचे पुढे काय?

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाईल का, हा सध्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरत आहे. पवार यांनी ५ नोव्हेंबर २०२४ रोजी दिलेल्या विधानात आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, दीड वर्षांनी राज्यसभेची मुदत संपल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी सूचित केले होते. त्यामुळे आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत पवार नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीतील सर्वात मोठा घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे गटाचा या एकमेव शक्य असलेल्या जागेवर दावा असणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे ही जागा शरद पवार, काँग्रेस की उद्धवसेनायापैकी कोणाला मिळणार, यावर आघाडीतील अंतर्गत चर्चा निर्णायक ठरणार आहे.

शिंदेसेनेला किती जागा?

सात राज्यसभा जागांपैकी महायुतीला किमान सहा जागा निश्चित मिळतील, असे सध्याच्या आकड्यांवरून स्पष्ट होते. मात्र, या सहा जागांचे वाटप भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटामध्ये कसे होणार, यावर सध्या लक्ष लागलं आहे. राजकीय वर्तुळात भाजपला चार जागा, तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कसे असेल संख्याबळाचे समीकरण?

राज्य विधानसभेचे सध्याचे संख्याबळ हे २८६ इतके आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत. एक जागा निवडून येण्यासाठी ३७ आमदारांचा कोटा असेल. सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे १६ आणि उद्धवसेनेचे २० असे तीन पक्षांचे मिळून ४६ आमदार आहेत. माकप आणि शेकापचे प्रत्येकी एक सदस्य आहेत.

मविआ एकत्र राहिली आणि या दोघांनी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर एक खासदार निश्चितपणे निवडून जाईल. मात्र, त्या परिस्थितीत ती एक जागा उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यापैकी कोणाला द्यायची यावर एकमत व्हावे लागेल. ३७ मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर मविआकडे केवळ ११ मते शिल्लक असतील. समाजवादी पार्टीचे २ तर एमआयएमचे एक आमदार सोबत गेला तर १४ मते अतिरिक्त असतील.
महायुतीची स्थिती खूपच मजबूत आहे. भाजपचे १३१, शिंदेसेनेचे ५७, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ४० असे मिळून २२८ आमदार आहेत. सात आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याने हे संख्याबळ २३५ इतके आहे. त्यामुळे त्यांचे सहा उमेदवार राज्यसभेवर नक्कीच निवडून जातील. भाजपने सातवा उमेदवार दिला तर चुरस होईल.