छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये एक विद्यार्थी, एक झाड पर्यावरणपूरक उपक्रम

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): वृक्षलागवड ही काळाची गरज बनली असून, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने झाड लावणे व त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे. 

या उद्देशाने वृक्षवल्ली टीम सिल्लोड यांनी १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सिल्लोड येथे एक विद्यार्थी, एक झाड हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवला. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनाने झाली. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक निशांत म्हस्के होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वृक्षवल्ली टीम तर्फे डॉ. शेखर दौड, योगेश दिवटे यांची उपस्थिती होती.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना झाडे लावण्यास प्रवृत्त करणे, झाडांचे संगोपन करणे आणि विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे हा होता. या उपक्रमात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आंबा, चिंच, जांभूळ, लिंब, पेरू, चिकू, डाळिंब, आवळा, गुलमोहर, चाफा, बकुळ, कांचन, पारिजातक अशा विविध रोपांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोपटे देऊन ते विद्यालयाच्या आवारात, शेतात, गावात किंवा स्वतःच्या घरी लावण्याचे व त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. 

डॉ. शेखर दौड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, झाडे ही आपली जीवनदायिनी आहेत आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. योगेश दिवटे म्हणाले की, १०,००० वृक्ष लागवडीचा संकल्प अंतर्गत आतापर्यंत अनेक शाळेमध्ये वृक्षवल्ली टीम हा उपक्रम राबविला आहे व पर्यावरणाचे संरक्षण करत आहे. याप्रसंगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गजानन डमाळे यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व आणि पर्यावरणाचा राखला जाणारा समतो याविषयी आपल्या भाषणात सांगितले. 

कार्यक्रमाच्या शेवटी, या उपक्रमातून मुलांमध्ये पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाचे संकट व वृक्षारोपणाचे महत्त्व, त्याचबरोबर झाडे जगवण्याची शपथ मुख्याध्यापक निशांत म्हस्के यांनी मुलांना आपल्या भाषणात दिली.

सूत्रसंचालन डॉ. रमेश काळे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील शिक्षक रमेश सोनवणे, लक्ष्मण कोलोड, नरेशसिंग राजपूत, भिकन आगारे, सुनील तांबे, कडूबा गीते, रमेश परदेशी, अंगद काळे, गणेश चव्हाण, भास्कर सागरे, अरविंद सोनवणे, डॉ. अमोल ताटू, गजानन दौड, संगीता तायडे, संगीता काळे, नम्रता वडमारे, हर्षदा सानान्से यांनी परिश्रम घेतले.