केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरात पडसाद उमटले आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कांदा निर्यातबंदीवर नाराजी व्यक्त करत केंद्राला पत्र लिहिले आहे.
’केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकर्यांना धक्कादायक आहे.’ अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली. तसेच, ’बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकर्यांना उद्ध्वस्त करणारी आहे.
तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवून शेतकर्याना दिलासा द्यावा, अशी मागणीही उदयनराजेंनी केली आहे. ‘आधीच लॉकडाउनच्या संकटातून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार हे आता कुठे सावरत असताना अचानक केलेली निर्यातबंदी त्यांच्यासाठी घातक ठरेल आणि त्यांचे फार मोठे नुकसान होईल. याचा सहानुभुतीपूर्वक विचार करून आपण कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदारांना दिलासा द्यावा. त्याचबरोबर आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. महाराष्ट्रातल्या शेतकर्यांची तसेच व्यापार्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थात ही कांद्यावर अवलंबून आहे.