नवी दिल्ली- अयोध्येतील वादग्रस्त राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी सुप्रीम कोर्टाने आता आणखी पुढे ढकलली आहे. या प्रकरणी १० जानेवारी रोजी नव्या पीठाची नियुक्ती होणार असून त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सध्या जे पीठ या प्रकरणाची सुनावणी घेत होते, त्यातील एक न्यायमूर्ती निवृत्त झाल्याने नव्या पीठाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. यामुळेच या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अवघ्या १ मिनिटात सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाशी संबंधित
याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. या प्रकरणात जानेवारीपासून
सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाकडे सध्या अन्य प्रकरणेही
असल्याचे सांगितले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ३०
सप्टेंबर २०१० मध्ये २.७७ एकर जमीन तीन पक्षकारांमध्ये म्हणजेच सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला
यांच्यामध्ये समान वाटण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात १४ पेक्षा जास्त
याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने ९ मे २०११ मध्ये या निर्णयाला
स्थगिती दिली होती. लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने राम मंदिर उभारणीसाठी पुन्हा
मागणी जोर पकडू लागली आहे. हिंदुत्ववादी संघटना ठिकठिकाणी बैठका, सभा घेत असल्याने केंद्र सरकारवरील
दबाव वाढत आहे.
असा होता अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय
अलाहाबाद हायकोर्टाच्या तीन सदस्यीय पीठाने ३० सप्टेंबर २०१० ला २.१ अशा बहुमताने दिलेल्या निर्णयात
म्हटले होते की,२.७७ एकरची जमीन तिन्ही पक्षकारांना
समान भागात वाटली जावी. पण कोणत्याही पक्षाने हा निर्णय मान्य केला नाही. सुप्रीम
कोर्टात याला आव्हान देण्यात आले. सुप्रीम कोर्टाने ९ मे २०११ रोजी अलाहाबाद हायकोर्टाच्या या
निर्णयावर स्थगिती आणली होती. त्यानंतर गेल्या ८ वर्षांपासून हे प्रकरण सुप्रीम
कोर्टात प्रलंबित आहे.