नवी दिल्ली : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांच्यावर भाषिक मुद्द्यावरून टीका केली होती. रटाळ प्रवचनाच्या राजकीय टीका टिप्पणी करू नका, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. यावर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पलटवार केला होता. जी लोक कार्यक्रमाला आली ती सर्व लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरली नसतील. पण, राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत, अशी उपरोधिक टीका कोश्यारी यांनी केली. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, त्याला नीट धोतर नेसता येत नाही, तो काय आम्हाला अक्कल शिकवतोय. जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही, तो ठाकरेंना सांगतोय की मोदींना घाबरू नका. मोदींना कोण घाबरतंय? काल राहुल गांधींनी सांगितलं नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यात डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत नाही. गांधींचे भाषण सुरू असताना पंतप्रधान आणि अमित शाह यांनी संसदेतून पलायन केले आणि हे आम्हाला सांगत आहेत. तुमच्या हातात सत्ता आणि एजन्सी आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगत आहात. पहिले नीट धोतर नेसायला शिका आणि मग इथे महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवा. हा एक नंबरचा लफंगा माणूस आहे. त्याला पद्मभूषण दिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करणारा हा माणूस आहे. त्याला भारतीय जनता पक्षाने पद्मभूषण दिले. हा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार नाही मिस्टर फडणवीस हे लक्षात घ्या. त्याला पद्मभूषण देणार्यांना बाळासाहेब ठाकरेंनी जोड्याने मारले असते, अशी टीका त्यांनी केलीय.
नेमकं काय म्हणाले होते भगतसिंह कोश्यारी?
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले होते की, संघाच्या कार्यक्रमात आलेले ते मोदींना घाबरून नाही आले. मी राज ठाकरे यांचा आदर करतो. मला असं वाटतं आहे की, राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत. त्यांनी घाबरलं नाही पाहिजे. त्यांनी मोंदीजींच्या जवळ गेलं पाहिजे. मोदींजींसाठी सर्व जनता समान आहे. ज्याप्रमाणे रामाला त्यांची सर्व प्रजा समान होती, त्याप्रमाणे मोदींजींना देखील सगळे समान आहेत. राज ठाकरे माझ्या लहान भावासारखे आहे. ते खूप चांगले, कडक नेते आहे. त्यांना मी सांगू इच्छितो मोदींना घाबरू नका. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीमध्ये आहात. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. घाबरायचं असेल तर चुकीचे काम करण्यास घाबरा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.