बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला सर्वोच्च न्यायालयातून मोठा धक्का बसला आहे. हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, आता सुप्रीम कोर्टानेही त्याचा अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर आज या अर्जावर सुनावणी झाली.
दरम्यान या प्रकरणात वाल्मिक कराडने यापूर्वी बीड जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन तसेच दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेता, दोन्ही न्यायालयांनी त्याचे अर्ज फेटाळले होते. त्यानंतर वाल्मिक कराडने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती, पण येथेही त्याला दिलासा मिळालेला नाही.
पुन्हा जामीन अर्जाची संधी, पण अटींसह...
सुप्रीम कोर्टाने जरी आज जामीन नाकारला असला, तरी भविष्यात वाल्मिक कराडला पुन्हा जामीनासाठी अर्ज करता येणार आहे. मात्र, जर खटल्याची सुनावणी दीर्घकाळ पुढे गेली नाही, तरच तो सुमारे एका वर्षानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. या प्रकरणाची पहिली सुनावणी 19 फेब्रुवारी रोजी झाली होती.
वाल्मिक कराडवर काय आरोप?
संतोष देशमुख यांचा खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आला होता. हा खून खंडणी प्रकरणातून झाल्याचा दावा देशमुख कुटुंबीयांनी सुरुवातीपासून करत आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला. मोर्चे आणि आंदोलनांनंतर तपासाला गती मिळाली आणि अखेर आरोपींना अटक करण्यात आली.
चौकशीत या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासह त्याच्या साथीदारांवर मोक्का (MCOCA) लावण्यात आला आहे. आरोपी स्वतः निर्दोष असल्याचा दावा करत असले, तरी सरकारी पक्षाने तो फेटाळला आहे.
कृष्णा आंधळे अजूनही मोकाट
दरम्यान, या हत्या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दावा केला आहे की, कृष्णा आंधळे हा आतापर्यंत तीन वेळा आपल्या गावी येऊन गेला आहे. याबाबतची माहिती त्यांनी CID ला दिल्याचेही त्यांनी सांगितले. धनंजय देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, कृष्णा आंधळे मोबाईल वापरत नसल्याने त्याचे लोकेशन शोधणे अवघड जात आहे. मात्र पोलिसांचे खबऱ्यांचे जाळे प्रभावीपणे वापरले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.