मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रारूप मतदार यादीमधून राज्यातील तब्बल २ कोटी ७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर मतदारांचे फॉर्म जमा होऊ शकलेले नाहीत किंवा त्यांच्या माहितीचे डिजिटायझेशन होऊ न शकल्याने त्यांची नावं या यादीत समाविष्ट होऊ शकलेली नाहीत.
निवडणूक आयोगाकडून घरोघरी जाऊन करण्यात आलेली पडताळणी, डिजिटायझेशनसाठी फॉर्म जमा न होणे आणि इतर तांत्रिक कारणांमुळे या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं समाविष्ट होऊ शकलेली नाहीत. त्याशिवाय पत्त्यावर अनुपस्थित असलेल्या, स्थलांतरित झालेल्या, मृत्यू झालेल्या, परदेशात स्थायिक झालेल्या आणि दुबार मतदारांचाही एसआयआरच्या प्रारूत यादीतून वगळण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.
दिल्लीमध्येही मोठ्या प्रमाणावर नावे हटवली
महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीमधूनही एकूण १ कोटी ४५ लाख नोंदणीकृत मतदारांपैकी तब्बल ४७ लाख ५६ हजार ७२२ मतदारांची नावं यादीतून वगळण्यात आली आहेत. तसेच दिल्लीतील सुमारे ९७ लाख ५३ हजार ५०७ मतदारांची नोंद डिजिटाईझ झाली आहे.
प्रारूप यादीत नाव नसल्यास काय करावं?
ज्या मतदारांचं नाव एसआयआरच्या प्रारूप मतदार यादीत नसेल. ते ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान, आपले दावे आणि आक्षेप नोंदवू शकतील. या दाव्यांचे निराकरण करण्याची प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी एसआयआरनंतरची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. जर तुमचं नाव एसआयआरच्या प्रारूप मतदार यादीत नसेल तर त्याचा अर्थ तुमचा मतदान करण्याचा अधिकार संपुष्टात आला असा होत नाही. तुम्ही तुमचं नाव पुन्हा मतदार यादीत जोडून घेण्यासाठी दावा करू शकता. त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ड्राफ्ट रोलमधील तुमचं नाव तपासून घेऊ शकता.
आक्षेप नोंदवण्यासाठी करा अर्ज
आज प्रसिद्ध झालेल्या एसआयआरच्या प्रारूप आराखड्यामध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्ही ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत फॉर्म भरू आवश्यक कागदपत्रे जोडून मतदार यादीत नावाचा पुन्हा समावेश करण्यासाठी दावा करू शकता.