* सातारा परिसरातील दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी केला उलगडा
* चुलत बहिणीचा नवराही सहभागी
औरंगाबाद शहरात खळबळ माजविणार्या दुहेरी
हत्याकांड प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. मयत
खंदाडे -राजपूत बहिण-भावाचा चुलतभाऊ सतीश काळूराम खंदाडे (रा. पाचन वडगाव)
आणि त्याचा सख्खा मेहुणा अर्जून देवचंद्र राजपूत (रा. वैजापूर) यांना
पोलिसांनी या प्रकरणी अटक केली असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.
त्यांच्याकडून सोने व रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी
सांगितले. हे हत्याकांड संपत्तीच्या कारणावरून, भाऊबंदकीतून उद्भवले असावे
असा अंदाज आहे.
या दुहेरी हत्याकांडाचे प्रकरण समोर
आल्यापासून या संदर्भात खंदाडे-राजपूत कुटुंबियांच्या नातेवाईकांवर
पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले होते. ज्या पद्धतीने खून झाले ते पाहता
यामागे कुणीतरी ओळखीचे असावे या निष्कर्षाप्रत पोलिस घटना पाहता क्षणी आले
होते. तपासाची संपूर्ण दिशा नातेवाईकांकडे ठेवण्यात आली होती. हे हत्याकांड
रात्री 8.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आले. दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास
मयत किरण खंदाडे हिने आपल्या आईला फोन केल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यावरून हे हत्याकांड दुपारी 2 ते सायंकाळी 6 च्या दरम्यान झाले असावे असा
अंदाज व्यक्त केला जात होता.
या प्रकरणी साविस्तर
माहिती अशी की, सातारा परिसरातील एमआयटी कॅम्पसच्या समोर कनकोरबेन नगरात
लालचंद खंदाडे 2017 पासून भाड्याच्या बंगल्यात पत्नी, दोन मुली व एक मुलासह
राहतात. खंदाडे यांची पत्नी एलआयसीची विमा प्रतिनिधी आहे.
हे
कुटुंब मुळचे जालना जिल्ह्यातील पाचन वडगाव येथील आहे. तेथे त्यांची
बर्यापैकी शेती असून त्यांची गणना श्रीमंत शेतकर्यांत होते. ते बहुतेक
वेळा पाचन वडगाव येथेच राहतात. तोच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. मुलांच्या
शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबादेत बंगला भाड्याने घेतल्याचे सांगण्यात येते.
घटनेच्या
दिवशी मंगळवारी लालचंद खंदाडे यांनी आपली पत्नी व मोठी मुलगी सपनाला पाचन
वडगावला बोलावले होते. त्या दोघी मंगळवारी सकाळीच गावाकडे रवाना झाल्या आणि
बंगलावर किरण (18) व सौरभ (16) हे बहिण-भाऊ राहिले. रात्री 8.30 वाजेच्या
सुमारास खंदाडे कुटुंबिय पाचन वडगावहून औरंगाबादला आले. त्यावेळी आवाज
देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने ते चक्रावले, बंगल्याचे दारही अर्धवट उघडले
होते. हे सर्वजण आत गेले तेव्हा त्यांना बाथरुममध्ये किरण आणि सौरभ
रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेले दिसले. या दोघांचेही गळे धारदार
शस्त्रने कापलेले होते. तसेच घरातील दीड किलो सोने व रोख रक्कम लुटण्यात
आले होते.
पोलिसी चक्र फिरले
औरंगाबाद
शहरासाठी दुहेरी हत्याकांडाची घटना खळबळ माजवणारी होती. पोलिसांनीही
अत्यंत तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद,
उपायुक्त डॉ. राहुल खाडे, मीना कमवाना, सहय्यक आयुक्त हनुमंत भापकर,
सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाले, गुन्हे शाखेचे निरीक्षक
अनिल गायकवाड आदी अधिकार्यांनी ठस्से तज्ज्ञ पथक तसेच न्यायवैधक शाखेला
बरोबर घेऊन घटनास्थळ गाठले. श्वान पथकही मागूनच आले होते. मात्र आरोपींनी
वाहनातून पळ काढला असावा एवढीच माहिती त्यातून पोलिसांच्या हाती लागली.
घटनास्थळी चहाचे 4 कप, कॅरम बोर्ड तसेच दोघा बहिण-भावाचे मृतदेह एकाच
ठिकाणी आढळून येणे या बाबीवरून हे काम कुणातरी ओळखीतल्याच गुन्हेगाराचे
असावे या निष्कर्षाप्रत पोलिस अगदी पहिल्या दिवसापासून आले होते. त्याच
दृष्टीने त्यांचा तपास होत राहिला आणि त्यांना यश मिळाले.
हत्येला कौटुंबिक भांडणाची किनार
मयत
किरण आणि सौरभ यांचा परिवार आणि आरोपी सतीश यांच्या परिवारात शेती वरून
वाद सुरू होते.या वादातूनच आरोपी सतीश ने हत्येचा कट रचला असावा अशी चर्चा
आहे. हत्या केल्यानंतर घरात सोने असल्याची माहिती सतीश ला असावी त्यामुळे
चोरी चा बनाव या मारेकर्यांनि केला असावा अशी देखील शक्यता व्यक्त करण्यात
येत आहे.मात्र सध्या स्थितीत चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे
पोलिसांचे म्हणणे आहे.कोठडी दरम्यान पुढे या प्रकरणातील अणखी धागेदोरे
समोर येण्याची शक्यता आहे.
असा केला गेम
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार औरंगाबादच्या बंगल्यात फक्त दोघे बहीण-भाऊच
असल्याची माहिती मिळताच पाचन वडगाव येथेच असलेल्या आरोपीसतीश याच्या
डोक्यात हत्येचा कट शिजला. त्याने त्याचा मेहुणा अर्जुनला फोन लावून
बोलावले व दोघांनी 500 रुपये पेट्रोल दुचाकीमध्ये टाकून जालना गाठले. तेथून
दोन चाकू खरेदी केले आणि ते सरळ औरंगाबादच्या बंगल्यात पोहचले. मयत किरण
आणि सौरभ या बहीण भावांना चुलत भावाच्या सैतानी डोक्यात काय शिजते आहे हे
कळण्याला मार्ग नव्हता. या बहीण-भावांनी सतीश आणि आपले चुलत भाऊजी अर्जुन
यांचे मनापासून स्वागत केले. चौघेचहा प्यायले, कॅरम खेळले. 4 वाजता किरणने
या दोघांना फ्रेश होण्यासाठी सांगितले. साबण देण्याच्या बहाण्याने सतीश
याने सौरभला बाथरूममध्ये बोलावलं आणि त्याचा गळा चिरला तर मेहुण्याने मागून
चाकूचा वार केला. त्याच्या ओरड्यांचा आवाज आल्याने बहीण किरण बाथरूमकडे
पळत आली. त्यावेळी आरोपींनी तिचाही गळा चिरला. आणि घरातील सोनं घेऊन पसार
झाले.