भारतीय जहाजांसाठी स्ट्रेट होर्मुझ अद्याप खुले नाहीच !! इराणने ठेवली भारतासमोर अट ....

Foto
तेहरान - स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून भारतीय जहाजांना प्रवास करण्याची परवानगी दिल्याची बातमी इराणने फेटाळली आहे. भारताचा झेंडा असणाऱ्या तेल टँकरला स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून प्रवासाची मुभा देण्यात आली नाही असं वृत्त इराणी सूत्रांच्या माध्यमातून रॉयटर्सने प्रसिद्ध केले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इराणी परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी साधलेल्या संवादानंतर इराणने भारताच्या जहाजांना स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून प्रवासाची मुभा दिली असल्याचं सांगितले जात होते. कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅसच्या वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा सागरी मार्ग भारतासाठी खुला करण्यात आला असल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु आता इराणने हा दावा फेटाळून लावला आहे. आतापर्यंत केवळ ३ चीन टँकरला स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली आहे. इराण चीनला तेल विकून पैसे कमावत आहे.

इराणने सर्व देशांसमोर अट ठेवली आहे. इस्रायली राजदूताला जर एखादा देश बाहेर काढत असेल तर त्याला स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून प्रवासाची परवानगी देण्यात येईल. इराणच्या ताज्या विधानावर भारताकडून कुठलीही प्रतिक्रिया नाही. याआधी भारतीय सूत्रांनी दावा केला होता की, भारतीय टँकर पुष्पक, परिमल हे स्ट्रेट होर्मुझ सुरक्षितपणे प्रवास करत आहेत. परंतु अमेरिका, युरोप आणि इस्रायली जहाजांना या महत्त्वाच्या जलमार्गावर निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. भारत आणि इराण यांच्यात पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवर चर्चा सुरू आहे. त्यात स्ट्रेट होर्मुझचा मुद्दा महत्त्वाचा आहे. 

सौदीहून तेल टँकर मुंबईत पोहचला

सौदी अरेबियाहून कच्चे तेल घेऊन येणारा लायबेरियाचा झेंडा लावलेला टँकर होर्मुझ स्ट्रेट यशस्वीरित्या पार करून मुंबईत पोहचला आहे. या जहाजाचा कॅप्टन भारतीय होता. इराणवर अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यानंतर स्ट्रेट होर्मुझमधील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यावेळी भारतात पोहचणारे हे पहिले जहाज ठरले आहे. टँकर शेनलॉन्ग स्वेजमॅक्सने १ मार्च रोजी सौदीच्या रास तनुरा पोर्टहून कच्चे तेल लोड केले होते. ३ मार्च रोजी हे जहाज भारताच्या दिशेने रवाना झाले.  ८ मार्चला त्याचे शेवटचे लोकेशन होर्मुझची सामुद्रधुनी होती. त्यानंतर अचानक हे जहाज रडारवरून गायब झाले. सूत्रांनुसार, या खतरनाक क्षेत्रातून प्रवास करताना जहाजाने वेळ आणि ट्रॅकिंग लपवण्यासाठी जहाजातील ट्रांसपोंडर आणि AIS सिस्टम बंद केली होती. अत्यंत शिताफीने गनिमी काव्याचा वापर करून हे जहाज पुन्हा ९ मार्च रोजी ट्रॅकिंग डेटाबेसवर पुन्हा दिसले. अखेर ११ मार्चला हे जहाज सुरक्षितपणे मुंबईला पोहचले. 

अद्यापही भारतीय जहाजे होर्मुझ स्ट्रेट जवळ अडकली

काही भारतीय जहाजे आजही या संवेदनशील मार्गावर अथवा त्याच्या आसपास अडकली आहेत. जेव्हा या भागात युद्ध सुरू झाले तेव्हा कमीत कमी २८ जहाजे होर्मुझ स्ट्रेट परिसरात काम करत होती. ८ भारतीय जहाजे जी लढाई सुरू होण्यापूर्वी होर्मुझ स्ट्रेटच्या पूर्वेकडे होते. ते सुरक्षित पाण्यात प्रवास करत आहेत.